प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘महाविजय 2024’ या अभियानासाठी रत्नागिरी शहर भाजप सज्ज झाला आहे. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत 51 टक्के मतदान मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पक्ष संघटना बळकट करण्याचा रत्नागिरी शहर भाजप बैठकीत निर्धार करण्यात आला.
रत्नागिरी शहर भाजपाची महत्वाची बैठक गुरुकृपा मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये पक्षाच्या बूथचे सशक्तीकरण, गौरवयात्रा, भाजपा वर्धापन दिन या विषयांवर तपशीलवार चर्चा झाली. तसेच या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी जोरकस प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला शहराच्या 63 बूथपैकी 58 बूथमधून बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र विस्तारक, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, 3 माजी जिल्हाध्यक्ष व दोन माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. पुढीलवर्षी होणाऱया लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 51 टक्के मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे. सलग दुसऱयांदा भाजपाप्रणित मोदी सरकार केंद्रात व अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहे. केंद्रातील सत्ता सलग तिसऱयांदा मिळवून हॅटट्रिक करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यासाठी महाविजय 2024 हे अभियान पक्षाने सुरु केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 75 हजार घरी जाण्याचा कार्यक्रम संघटनेमार्फत राबवण्यात येणार आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा संकल्प पक्षाने केला असून दूरध्वनीच्या माध्यमातूनही लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 7820078200 या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विविध योजनांची माहिती ऍपमार्फत मतदारांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका, गाव, वाडी व बूथ पातळीवर पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जोरदार काम सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी शहरातील पक्षाची स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी शहर शाखेतर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठीच आज पक्ष सशक्तीकरण, स्वा. सावरकर गौरवयात्रा 12 एप्रिल, भाजपा स्थापना दिवस या बाबत बैठकीत मंथन झाले व एकूणच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, बाबू सुर्वे व एकूण 100वर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.