वृत्तसंस्था/ चंदीगढ
कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आलेली महिलांची टी-20 लिग क्रिकेट स्पर्धा आपल्याला प्रोत्साहन आणि उत्तेजन देणारी ठरेल, असे प्रतिपादन भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने केले आहे.
2020 च्या क्रिकेट हंगामामध्ये महिलांसाठी इंडियन प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा होण्याची शक्मयता कमी असल्याचे कौरने म्हटले आहे. त्यामुळे आता महिलांसाठी आगामी टी-20 लिग स्पर्धा उत्तेजन देणारी ठरेल. इंडियन प्रिमियर लिग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत तीन संघांचा समावेश करण्यात आला होता. पण बीसीसीआयने कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकल्याने आता महिलांच्या इंडियन प्रिमियर लिगवर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने आयपीएल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना समस्येमुळे भारतामध्ये नजीकच्या काळात स्पर्धात्मक क्रिकेट सुरू होईल, याची शंका येत असल्याने भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेसाठी आणखी काही कालावधीकरीता वाट पहावी लागेल. गेल्या मार्चमध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने अंतिमफेरीत प्रवेश मिळविला होता. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेनंतर कोरोना प्रसाराला प्रारंभ झाला आणि सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना किमान नोव्हेंबरअखेरपर्यंत क्रिकेट स्पर्धेसाठी वाट पहावी लागेल, असेही कौरने सांगितले.