प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱया कराड नगरपालिकेने आणखी एका धवल कामगिरीची नोंद केली आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱया राज्यातील पहिल्या 10 पालिकांमध्ये स्थान मिळवले आहे. याबाबतचे पत्र आज पालिकेस मिळाले आहे. दरम्यान, पहिल्या तीन क्रमांकांची निवड करण्यासाठी या 10 पालिकांना शनिवारी 29 रोजी पालिकेने केलेल्या उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्याबाबत सूचनाही माझी वसुंधरा संचालनालयाने पत्राद्वारे दिल्या आहेत.
पर्यावरणविषयक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान राबवले होते. यात सर्व नगरपालिकांचा सहभाग होता.
गेले वर्षभर नगरपालिकांनी विविध उपक्रम राबवून तयारी केली होती. या अभियानात राज्यात 10 पालिका अव्वल ठरल्या आहेत. त्यात कराड पालिकेने स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अगोदरच देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून कराड चर्चेत होते. यातच राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली कराड पालिकेने सरस कामगिरी केली आहे. अव्वल दहा पालिकांमधून पहिल्या तीन पालिका निवडल्या जाणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे पालिकांच्या उपक्रमांची पाहणी ऑनलाईन होणार आहे. यासाठी येत्या शनिवारी सादरीकरण होणार आहे. यातून पहिले तीन क्रमांक जाहीर होणार आहेत. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, हवा प्रदूषण तपासणी, सोलर सिस्टम, जल प्रदूषण रोखणे अशा उपक्रमात पालिकेने सहभाग घेतला होता. शनिवारी सकाळी 11.40 ते 12.10 या वेळेत कराड पालिकेने त्यांच्या उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करावे, असा सूचना पालिकेस प्राप्त झाल्या आहेत.