ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मालदीव आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना झाल्या आहेत. संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने आज सकाळी एका वृत्तासंस्थेला याबाबतची माहिती दिली.
संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतातील शेकडो लोक लॉकडाऊनमुळे विविध देशात अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया 7 मे पासून सुरू होणार आहे. ज्या लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना मायदेशी परत आणून 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुंबई किनाऱ्यावर तैनात असलेली एनएस जलाश्व, आयएनएस मगर या युद्धनौका मालदीवला रवाना झाल्या आहेत. आयएनएस शार्दुल दुबईला पाठवण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौका भारतात आल्यानंतर कोचीमध्ये येतील, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.