नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर मालाड पश्चिममधल्या इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटने प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून दोन लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी यावेळी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करत जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा देखील केली.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.