सागर सुरक्षा कवच अंतर्गत नौकांची तपासणी
मालवण:
सागर सुरक्षा कवच मोहिमेतंर्गत सुरक्षा यंत्रणेकडून बुधवारी दिवसभर सतर्कता बाळगली गेली होती. मासेमारी नौकांकडे ‘टोकन’ आहे का, याबाबत सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली. त्यामुळे टोकन न घेता मासेमारीस जाणाऱया नौकांचा मुद्दा यानिमित्त ऐरणीवर आला. परंतु ज्या पर्ससीन नौका विनापरवाना समुद्रात मासेमारीस जातात, त्यांच्याकडे टोकन आहे की नाही, हे इतरवेळी का तपासले जात नाही, सवाल मच्छीमारांकडून उपस्थित करण्यात आला.
बुधवारी मध्यरात्रीपासून सायंकाळी उशिरापर्यंत समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. तरीदेखील ठरल्याप्रमाणे वातावरणाचा अंदाज घेऊन सुरक्षा यंत्रणेने सागर सुरक्षा कवच मोहीम राबविली होती. यात सागरी पोलीस, मत्स्य, कस्टम, बंदर आदी सागरी सुरक्षेशी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत झाले होते. जिल्हय़ातील ठिकठिकाणच्या बंदरांमध्ये ये-जा करणाऱया नौका थांबवून त्यांना कागदपत्रांची विचारणा करण्यात आली.
विनापरवाना पर्ससीन नौकांकडे टोकन असते का? बुधवारी वादळसदृश स्थितीमुळे बहुतांश नौका मच्छीमारांकडून सुरक्षित ठिकाणी नेल्या जात होत्या. तालुक्यातील तळाशील, कोळंब तसेच देवगड बंदरात मासेमारी नौका आश्रयासाठी जात होत्या. या दरम्यान काही नौकांना मासेमारीचे टोकन आहे का, याबाबत सागरी सुरक्षा यंत्रणेकडून विचारणा करण्यात आली. त्यामुळे मासेमारीस जाताना टोकन घेण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर म्हणाले, आज सागर सुरक्षा कवच आहे म्हणून या गोष्टी तपासल्या गेल्या. देशाची सुरक्षा आम्हा सर्व मच्छीमारांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. परंतु जेव्हा विनापरवाना पर्ससीन नौका आणि एलईडी ट्रॉलर्स राज्याच्या आणि देशाच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करत असतात, तेव्हा त्यांच्याकडे टोकन असते का, हे का पाहिले जात नाही, हा आमचा सवाल आहे.