वाढत्या अपघातांमुळे निर्णय, तंत्रज्ञान जुने असल्याचेही कारण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकेकाळी भारताच्या वायुसंरक्षण यंत्रणेचा आधार असणारी मिग-21 श्रेणीतील विमाने 2024 पर्यंत वायुसेनेतून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मिग-21 बायसन या प्रकारच्या युद्ध विमानांच्या 51 तुकडय़ा (स्क्वाड्रन्स) निवृत्त केली जातील, अशी माहिती देण्यात आली.
गेल्या 20 वर्षांमध्ये मिग विमानांच्या दुर्घटना मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे अनेक चालकांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनांमुळे वायुदलाची मोठी हानी होत असून ती टाळण्यासाठी ही विमाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतण्यात आल्याचे स्पष्टीकरण वायुदलानेही दिले आहे.
देदिप्यमान इतिहास
मिग विमाने भारताच्या वायुदलात गेल्या किमान सहा दशकांपासून आहेत. 1971 च्या बांगला देश युद्धात या विमानांनी मोठा पराक्रम गाजवून पाकिस्तानच्या सेबर जेटस्चा ती कर्दनकाळ ठरली होती. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मिग 21 जातीच्या विमानांच्या 51 तुकडय़ा नियुक्त करण्यात आल्या होता. 2019 मध्येही बालाकोट येथील एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान वायुसेनेच्या एफ-16 विमानाला पाडण्याचा पराक्रम याच मिग-21 बायसन विमानाने केला होता. त्यावेळी हे विधान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे चालवत होते.
केवळ तीन तुकडय़ा राहणार
सप्टेंबर 2022 नंतर भारताकडे मिग-21 बायसन जातीच्या विमानांच्या केवळ 3 तुकडय़ा शिल्लक राहणार आहेत. त्यानंतर दरवर्षी प्रत्येकी 1 याप्रमाणे त्या निवृत्त केल्या जातील. अशा प्रकारे 2025 पर्यंत सर्व मिग 21 विमाने निवृत्त केली जातील. त्यांची जागा अत्याधुनिक चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पिढीतील युद्ध विमानांनी भरुन काढण्याची प्रक्रिया नंतर सुरु करण्यात येणार आहे.