प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात मुसळधार सुरुच असून शहरानजीकच्या मिरजोळे खालचापाट व शिळ धरण सांडव्याजवळच्या परिसरात भूस्खलनाचा धोका अधिक गंभीर झाला आहे. मिरजोळे खालचापाट परिसरात लावणी केलेली भातशेतीच भूस्खलनाच्या रडारवर आली आहे. तेथील भूस्खलनासह शेतीमध्ये दूर अंतरापर्यंत मोठय़ा भेगा गेल्यामुळे शेतकऱयांना शेतात जाणेही मुश्किल बनले आहे.
मुसळधार पाऊस कोसळताच मिरजोळे व शिळ ही दोन ठिकाणे भूस्खलनाच्या रडारवर आली आहेत. कारण येथील भूस्खलन रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांअभावी धोका अधिक गंभीर बनला आहे. पावसामुळे भूगर्भातील प्रवाहांमुळे भूस्खलनाचे प्रकार वाढू लागले आहेत. मिरजोळे खालचापाट परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात शेताचे मोठे भूस्खलन झाले होते. त्यानंतर गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे याच ठिकाणी पुन्हा मोठय़ा प्रमाणात जमीन खचली आहे.
येथे नुकतीच भातशेती लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. अशावेळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीच्या जमिनीला मोठ-मोठय़ा दूर अंतरापर्यंत भेगा गेल्या आहेत. त्यामुळे येथील शेतात वावरतानाही ग्रामस्थांसमोर धोका उभा ठाकला आहे. येथील नुकसानीची महसूल स्तरावरुन मंडळ अधिकारी व ग्रा.पं. सरपंच सरपंच व त्यांच्या सहकारी यंत्रणेकडून पाहणी करण्यात आली. येथील भूस्खलन रोखण्यासाठी 2 वर्षांपूर्वी संरक्षक उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. पण त्यावर अजूनही कोणतीच कार्यवाही प्रशासनस्तरावर झालेली नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. .
मिरजोळेतील 1.35 कोटींचा प्रस्तावावर कार्यवाही रखडलेली
मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडीदरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतजमीन चालू पावसाळय़ात दोनवेळा भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाबाबत यापूर्वीच 2019 मध्ये पाटबंधारे विभागाने 1 कोटी 35 लाखांचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाऊन त्याद्वारे उपाययोजनांसाठी प्राधान्याने कार्यवाही हाती घेतली जाणार होती. पण या कार्यवाहीची प्रतीक्षा गेल्या 3 वर्षांपासून असल्याने शेतकऱयांनी संताप व्यक्त केला आहे.
शिळ धरण सांडव्याजवळ पुन्हा भूस्खलन, वस्तीला धोका
मिरजोळे ग्रामपंचायत अखत्यारित असलेल्या नजीकच्या शिळ धरणाच्या सांडव्याजवळ होणाऱया अतिवृष्टीने मोठे भूस्खलन झाले आहे. येथील काही गुंठे बागायतीची जमीन या वेळेस तीनदा खचली. त्यात आंबा-काजूच्या 40 कलमांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे 250 मीटर अंतरावर असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिळ धरणाच्या सांडव्याजवळील काही भागात भूस्खलन झाले होते. त्यानंतर येथील आणखीन 10 गुंठे जमीन पुन्हा खचली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हा भाग धोकादायक बनला. तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्यासह पोलीस पाटील सोनिया कदम व ग्रामस्थांनी मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली. सांडव्यापासून 150 मीटर अंतरावरील बाजू खचली आहे. तेथील डोंगर खाली येत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सुरुवातीला आंब्याची 4 झाडे उन्मळून गेली होती. आतापर्यंत 30 ते 40 गुंठे भाग खचला आहे. आंबा, काजूची 40 कलमांचे नुकसान झाले आहे. हा भाग असाचा कोसळत राहिला तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूगर्भातील प्रवाह वेगाने धरण सांडव्याच्या दिशेने प्रवाहित होत आहेत. तसेच धरणातील सांडव्यातून वाहणारे पाणी जमिनीत झिरपत असल्याने डोंगरातील भागाचे भूस्खलन होत आहे. भविष्यात सांडव्यापासून पुढे 50 मीटर अंतरावर देसाईवाडीत सुमारे 700 हून अधिक लोकवस्ती आहे. डोंगर खचण्याचा प्रकार कायम राहिल्यास जवळच असलेल्या 3 घरांना धोका संभवतो, असे सांगितले जात आहे. या खचलेल्या 200 मीटर भागात आणखी नवीन संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्तावही नव्याने पाठवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.