ऑनलाईन टीम / मुंबई
नव्वदचे दशक गाजवणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे अनिल कपूर. त्यांचा सर्वांत गाजलेला चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचा लवकरच रिमेक येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया’ला पाहायला मिळेल का ?अशी उत्सुकता आहे. यावर मात्र अभिनेत्री सोनम कपूर नाराज असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाचा रिमेक येणार अशी माहिती मिळताच तिने ट्विरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
‘मिस्टर इंडिया’चा रिमेक येणार असल्याची माहिती चित्रपटातील मुख्य कलाकारांनाच माहितच नसल्याचं सोनमने म्हटलं आहे. काही दिवसापूर्वीच चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करुन ‘मिस्टर इंडिया’चा रिमेक येणार असल्याची माहिती दिली होती. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर सोनमने ट्विट करत नाराजी व्यक्त केली.
“गेल्या काही दिवसापासून मला अनेक जणांनी ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकबाबत विचारलं. मात्र खरं सांगायचं झालं तर मला या रिमेकविषयी काहीच कल्पना नाही. इतकंच कशाला माझ्या वडिलांनाही याबाबत काहीच माहिती नाही. ज्यावेळी अली अब्बास यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली तेव्हा आम्हाला समजलं”, असं सोनम म्हणाली.