ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणास्तव लवकरच बुरखाबंदी करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसदीय समितीने बुरखाबंदीचा प्रस्ताव दिला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच कोणी बुरखा काढण्यास नकार दिल्यास पोलीस वॉरंटशिवाय संबंधिताला अटक करू शकणार आहेत.
मागील वर्षी श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी दहशतवाद्यांनी चर्चसह अन्य ठिकाणी केलेल्या हल्ल्यात 258 नागरिकांचे बळी गेले होते. त्याची दखल घेत सरकारने दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी बुरखाबंदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच वंशाच्या आणि धर्माच्या नावाने राजकारण करणाऱया राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करावी असेही म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत विभागीय निरीक्षण समितीचे अध्यक्ष खासदार माल्लीथा जयातिलाका यांनी आपला अहवाल दिला आहे.