वृत्तसंस्था/ जयपूर
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकाच्या जोरावर (103) मंगळवारी येथे झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील सामन्यात मुंबईने महाराष्ट्राचा 6 गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील मुंबई संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. मात्र महाराष्ट्र संघातील यश नहार आणि अझीम काझी यांची शतके वाया गेली. मुंबईच्या धवल कुलकर्णीने 5 गडी बाद केले.
या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 279 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईने 47.2 षटकांत 4 बाद 280 धावा जमवित हा सामना जिंकताना 4 गुण वसूल केले.
महाराष्ट्र संघाच्या डावामध्ये नहारने 133 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह 119 धावा तर काझीने 118 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 104 धावा झळकविल्या. कर्णधार गायकवाडने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. मुंबईच्या अचूक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राची एकवेळ स्थिती 4 बाद 38 अशी केविलवाणी होती. नहार आणि काझी यांनी पाचव्या गडय़ासाठी 214 धावांची भागिदारी केली. महाराष्ट्राच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मुंबईतर्फे धवल कुलकर्णीने 44 धावांत 5 तर शार्दुल ठाकुर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावात कर्णधार अय्यरने 99 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 103, जैस्वालने 66 चेंडूत 5 चौकारांसह 40, पृथ्वी शॉने 38 चेंडूत 6 चौकारांसह 34, सुर्यकुमार यादवने 27 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29, शिवम दुबेने 39 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 47 तर सर्फराज खानने 2 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे सत्यजीत बच्छावने 59 धावांत 3 तर काझीने 60 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र 50 षटकांत 9 बाद 279 (नहार 119, काझी 104, गायकवाड 19, कुलकर्णी 5-44, ठाकुर 1-57, देशपांडे 1-60), मुंबई 47.2 षटकांत 4 बाद 280 (जैस्वाल 40, शॉ 34, अय्यर नाबाद 103, यादव 29, दुबे 47, सर्फराज खान नाबाद 12, बच्छाव 3-59, काझी 1-60).