मास्क लावा, सोशल डिस्टंसिंग पाळा आणि हातपाय साबणाच्या पाण्याने धुवा कोरोना प्रतिबंधावरील हे प्राथमिक नियम मुंबई विसरली की काय असे वाटत असतानाच टोकाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या कमी होत असल्याचे पहिले आशेचे किरण मुंबईतूनच दिसू लागल्याने कोरोनाच्या महामारीत हेही नसे थोडके असे वाटू लागले आहे….
मागच्या वर्षी कोरोनाची राजधानी झालेली मुंबई, मधल्या काळात डिसेंबर- जानेवारी महिन्यात स्थिरावणारी मुंबई आणि फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्या वाढीत पुन्हा ढेपाळणारी मुंबई, अशी मुंबईची तिन्ही रूपे अंगावर काटा आणणारी होती. कोरोना संपतो की नाही या प्रश्नाने प्रत्येक मुंबईकर ग्रासून गेला होता. आता मात्र मुंबईकरांमधे पुन्हा आशेची पालवी फुटू लागली आहे. रुग्णसंख्येच्या उच्चांकाच्या सगळ्या मर्यादा पार केल्याचे दिसून येत असताना मुंबईत संख्या स्थिरावून घट होत असल्याचे प्रत्येक दिवशी आशादायी चित्र दिसत आहे. त्या तुलनेत राज्याची रोजची रुग्णसंख्या सध्या नवनवे उच्चांक करत असल्याचे समोर येत आहे. मुंबईबाहेर रुग्णसंख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही, मात्र त्याचवेळी मुंबईतील घट व यामागील कारणमीमांसा संशोधनाची ठरावी अशी आहे. कोणत्याही बाबीत मुंबईचा आदर्श नेहमी समोर ठेवला जातो. गतवर्षी कोरोना संसर्ग वाढत असताना मुंबईतील घनदाट वस्ती आणि उपाययोजनांची अंमलबजावणी याचे आव्हान समोर होते. तरीही थोडय़ा फार प्रमाणात यश मिळत होते. मात्र कोरोनाचा डबल म्युटंट घेऊन दुसरी लाट आली. या लाटेत मात्र मुंबई पुन्हा हेलकावे घेऊ लागली. दरम्यान घनदाट लोकवस्ती यासह ऑक्सिजनचा तुटवडा, रेमेडिसवीर इंजेक्शनचा काळाबाजार, सणउत्सव, ल न सोहळे आणि नियम न पाळता फिरणारे आगंतुक प्रवासी याचेच आव्हान खरे होते. पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेला गांभीर्याने घेण्यास कंटाळलेल्या मुंबईत रुग्ण वाढ होऊ लागली होती. मुंबई पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न पणास लागले असताना घटत जाणारी रुग्णसंख्या सकारात्मक संदेश देत आहे.
मुंबईतील घटणाऱया रुग्णसंख्येवर लक्ष दिल्यास 7 एप्रिल 10,442 एवढी संख्या होती. दुसऱया दिवशी ती सुमारे 2 हजाराने कमी होत 8,938 एवढी झाली. मात्र 9 ते 11 एप्रिलदरम्यान पुन्हा काहीशी वाढून 9 हजाराच्या संख्येत नोंद करण्यात आली होती. तर 11 एप्रिल रोजी पुन्हा सुमारे अडीच ते 3 हजाराने उतरण्यास सुरुवात झाली. 12 एप्रिल रोजी 6,893 नोंद झालेली रुग्णसंख्या 13 आणि 14 एप्रिल अशा दोन दिवसात प्रति दिन सुमारे ते दीड हजाराने वाढत अनुक्रमे 7 आणि 9 हजाराच्या संख्येत आली होती. मात्र 15 ते 18 एप्रिल अशा 4 दिवसात 8 हजाराच्या संख्येत स्थिरावली असल्याचे निदर्शनात आले. पुढे 19 ते 23 एप्रिल या 5 दिवसात पुन्हा सुमारे हजार ते 9 शे ने कमी होत या 5 दिवसात 7 हजाराच्या संख्येत स्थिरावली असल्याचे नोंद सांगते. 15 ते 18 हे 4 दिवस तर 19 ते 23 एप्रिल हे 5 दिवस असे मिळून सुमारे 10 दिवस रुग्ण संख्या घटत जाऊन स्थिरावल्याचे दिसून येत आहे. असे सुमारे 10 दिवस एकाच संख्येवर रुग्णसंख्या स्थिरावणे हे संसर्ग मर्यादा संपल्याचे प्रतीक मानले जात असल्याचे काही वैद्यकीय तज्ञांनी मत व्यक्त केले. तर 24 ते 25 एप्रिल रोजी आणखी काहीशेने रुग्ण संख्या कमी होऊन 5 हजाराच्या संख्येत मुंबईची दररोजची रुग्ण संख्या आली आहे. संख्या कमी होत असताना मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्यादेखील घटत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीत उपचारार्थ आणि सक्रिय रुग्ण संख्येतील होणारी घट महत्त्वाची ठरणारी आहे. गेल्या दहा दिवसांपासून म्हणजे 15 एप्रिल पासून सक्रिय रुग्ण संख्येवर नजर टाकल्यास ती देखील काहीशेने पण नियमित कमी होणारी दिसून येत आहे. 15 एप्रिल रोजी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 84,753 एवढी होती. मात्र 25 एप्रिल रोजीच्या नोंदीत सक्रिय रुग्ण 75,498 एवढी होती. गेल्या दहा दिवसात 9,255 एवढय़ा संख्येने घट झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरात मास्कची हेटाळणी करणारा मुंबईकर मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळताना दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेची विभागनिहाय कोरोना रणनीती चांगलीच कामाला लागलेली दिसत आहे. त्यामुळे नवीन रुग्णसंख्येत घट होत असून सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत जाणार असल्याचे तज्ञ मत व्यक्त करत आहेत. घटणाऱया संख्येचा असा ट्रेंड कायम राहील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मुंबईतील रुग्ण संख्या कमी होत असली तरीही मृत्यू संख्या मात्र दोन अंकात नोंद होत आहे. मृत्यू संख्या आणि मुंबईतील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही काही बाबींवर भर देणे महत्त्वाचे आहे. गंभीर रुग्णांच्या तुलनेत आयसीयू तसेच ऑक्सिजन बेडची व्यवस्था उभी करणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी मागील आठवडय़ात मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्र लस तुटवडय़ामुळे बंद होती. संसर्ग होणाऱया भागात लस तुटवडा परवडणारा नाही. रविवारी सायंकाळी दीड लाख लसीचा पुरवठा करण्यात आला. सोमवारपासून लसीकरण पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांनी वारंवार व्यक्त केले. कडक निर्बंधासह लसीकरण, बेड, आयसीयू, ऑक्सिजन, औषधे आणि वैद्यकीय सुविधा हे देखील महत्त्वाचे आहे. त्याचवेळी रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची कमतरता दुर्लक्षित करून चालणारे नाही. मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील कोरोना संसर्ग थोपवायचा असल्यास जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत 80 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे राज्य टास्क फोर्सने सुचवलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोरोना संसर्ग अधिक असणाऱया ठिकाणी लस आणि लसीकरण केंद्र वाढविणे गरजेचे आहे. रुग्ण सेवेवर ताण येत असल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्याचे काम युद्धपातळीवर करावे लागणार आहे.
राम खांदारे