प्रतिनिधी / रत्नागिरी
गणेशोत्सव साठी जाणाया चाकरमान्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ा सुरु झाल्या असून चाकरमान्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. रविवारी पर्यंत पोचलेल्या चार गाडय़ांतून दोनशे प्रवासी कोकणात पोचले आहेत.
शनिवारी रात्री मुंबईतून निघालेल्या 18 डब्याच्या ट्रेन मध्ये फक्त 30 प्रवासी होते. पहिल्या दिवशी गणपती विशेष चार रेल्वे गाडय़ा रविवारी रत्नागिरी सिंधुदुर्गात पोचल्या सर्व गाडय़ातून सुमारे दोनशे चाकरमानी पोचले. रेल्वे कर्मचारी यांना विचारले असता ते म्हणाले या वर्षीच्या गणपती विशेष रेल्वे गाडीला कधी नव्हे एवढा कमी प्रतिसाद मिळाला. गणपती जवळ आले असताना कमी प्रतिसादाच्या गाडय़ा आम्ही पाहिल्या नाहीत.
गाडीतून रत्नागिरी येथे उतरलेल्या एका चाकरमान्याला कमी प्रतिसादाबद्दल विचारणा केली असता त्याने सांगितले की आमचे मुंबईतील शेजारी या वर्षी कोकणात आपल्या घरी येणार नाहीत. गावी असलेला भाऊ उत्सव पार पाडेल असे ते म्हणतात.अनेकांची परिस्थिती अशीच आहे. एस टी बसला देखिल चाकरमान्यांचा अत्यल्पहून कमी प्रतिसाद आहे. गाव पातळीवरील अनेक समित्यांनी मुंबईकर बांधवांना कळविले की शासन व मंत्री काहीही म्हणत असले तरी चौदा दिवसांच्या अलगीकरणाशिवाय वाडीच्या आरती भजन कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. गाववाल्यांचा हा निरोप निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.