ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान, मुंबईतील अनेक भागात सोमवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रीड फेल्युअर मुळे हा बिघाड झाला होता.
- तातडीने चौकशी करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ग्रीड फेल झाल्याने मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला देखील फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द झालेच तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या, तर मंत्रालयासह सरकारी कार्यालये, बँका तसेच कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी यामुळे पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.