बेळगाव / प्रतिनिधी :
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करून विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच निवेदन देण्यात आले. या घटनेमुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा तातडीने संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई येथील बांद्रा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहामध्ये एकाने शिरून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, फुलांच्या कुंडय़ा व इतर वस्तूंची दगडफेक करून तोडफोड केली आहे. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. तेव्हा तातडीने दगडफेक करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जयभीम बहुजन युवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शक्ती संघ, कर्नाटक दलित युवा संघटना, डॉ. आंबेडकर क्रांती युवा संघटना यांच्यातर्फे निवेदने देण्यात आली. यावेळी लक्ष्मण कोलकार, अशोक कोलकार, सागर कोलकार, महेश गाडीवड्डर, प्रवीण आलकुंटे, रवि पात्रोट, मोहन कांबळे, साईनाथ जंतीकट्टी, रवि दोडमनी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.