ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटले आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. अधिक तपासासाठी बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. त्यातच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असे म्हणत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केले आहे.
या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आज सणसणीत टोला लगावला आहे. रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांचा समाचार घेतना म्हटले की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे राजकारण करू नका, असे म्हणत जर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात ही घटना घडली असती तर मुंबई बद्दल असे ट्विट केले असते का? असा प्रश्न विचारला आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळाची आठवण करून देताना शहाणे विचारतात की, फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन पूल कोसळला यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा अमृता फडणवीस यांना मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का? असे देखील विचारले आहे.