प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेबागेवाडी येथील चार महिलांसह पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातून त्यांना घरी जाऊ देण्यात आले तर 109 जणांनी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून प्रशासनाने शासकीय बसमधून त्यांनाही घरी पाठविले आहे.
हिरेबागेवाडी येथील रुग्ण क्रमांक 282, 285, 286 व 288 या चार महिला व रुग्ण क्रमांक 283 हा पुरुष असे एकूण पाच जणांना शनिवारी सकाळी घरी पाठविण्यात आल्याची माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील एकूण 73 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकीकडे हिरेबागेवाडी येथील बाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच औषधोपचाराने बरे होणाऱयांची संख्याही बऱयापैकी वाढली आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार एका हिरेबागेवाडीत 37 जणांना कोरोनाची लागण झाली असून एका वृद्धेचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे हिरेबागेवाडीवर जिल्हा प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर बाधितांच्या थेट व निकटच्या सहवासातील 109 जणांची संस्थात्मक क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आली आहे. बेळगाव शहर, हिरेबागेवाडी, बेळगुंदी, कुडची, हुक्केरी, रामदुर्ग, बैलहोंगल, सांबरा येथील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या जवळपास असलेल्या व इतर ठिकाणच्या लॉजमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते.
तब्बल दोन वेळा त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आल्याने क्वारंटाईनमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बुडा आयुक्त व नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे यांच्या उपस्थितीत या सर्व 109 जणांना परिवहन मंडळाच्या बसमधून त्यांच्या गावी पाठविण्यात आले. प्रत्येकाला बसमध्ये चढण्यापूर्वी पेढे वाटण्यात आले.
घरी गेल्यानंतरही पुढचे चौदा दिवस त्यांनी घराबाहेर पडू नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. यावेळी महसूल, पोलीस खात्याच्या अधिकाऱयांबरोबरच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. संस्थात्मक क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर पुढचे चौदा दिवस या सर्व 109 जणांना घरीच क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
प्रशासनाने दिला धीर
संस्थात्मक क्वारंटाईनमधून घरी जाणाऱया एका तरुणाने प्रशासनाचे आभार मानले. चौदा दिवसांच्या या काळात उपचारासह मानसिकरीत्या धीर देण्याचे काम डॉक्टर, पोलीस व अधिकाऱयांनी केले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने आमची व्यवस्था करण्यात आली. सध्या रमजानचा उपवास सुरू आहे. त्यासाठीही व्यवस्था करून देण्यात आली, असे सांगत प्रशासनाचे आभार मानण्यात आले.