मडगाव :
सनबर्नसारख्या इडीएम पाटर्य़ांमध्ये अमली पदार्थांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने गोव्याची बदनामी झाली आहे. यामुळे पर्यटनावर विपरित परिणाम झ?ालेले असून सरकारने व खास करून मुख्यमंत्र्यांनी अशा ईडीएम पाटर्य़ांवर बंदी घालावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी गुरुवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उचलून धरली.
सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असतो. संगीतासाठी नव्हे, तर अमली पदार्थांसाठी ही पार्टी सर्वश्रुत आहे. गोव्यात अमली पदार्थांचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे परिणाम पर्यटनावर झाले आहेत व गोवा 70 टक्के चांगल्या पर्यटकांना मुकला आहे, असे दावे आलेमाव यांनी केले.
सनबर्नविषयी पोलीस, राजकारण्यांना कल्पना
सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे पोलीस तसेच राजकारण्यांना माहिती आहे. यात सर्व जण भेदी आहेत, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. गोव्यात अमली पदार्थांचे वाढत चाललेले व्यवहार येथील युवा पिढीला बरबाद करून सोडतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे, असे आलेमाव म्हणाले.
पोलिसांना कार्यक्षम बनवावे
पोलिसांकडून अमली पदार्थांच्या व्यवहारांवर नीट कारवाई होत नाही. कारण त्यांना हप्ते पोहोचतात, असा आरोप त्यांनी केला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने याचा दोषारोप त्यांच्यावरही होत नाही का अशी विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कार्यक्षम बनवावे, अशी मागणी त्यांनी केली.
कळंगूट पट्टय़ातील हॉटेल्सवर मेहेरनजर का ?
उत्तर गोव्यात कळंगूट तसेच नजीकच्या किनारपट्टी भागांमध्ये कित्येक डिस्को जॉईंट असून तेथे अमली पदार्थांचा वापर होत असते. पहाटेपर्यंत हे जॉईंट्स व संबंधित हॉटेल्स कशी चालू असतात, असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला. ख्रिस्तीधर्मियांच्या विवाह सोहळय़ात रात्री 10 नंतर संगीत वाजविण्यास बंदी केली जाते. मग डिस्को असलेल्या हॉटेलांवर सरकारची मेहेरनजर का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला व कारवाईची मागणी केली. उत्तरेपुरते अमली पदार्थांचे व्यवहार सीमित नसून दक्षिण गोव्यातही त्यांचा शिरकाव झाला असल्याचा दावा आलेमाव यांनी केला. विवाहासारख्या सोहळय़ांत संगीत वाजविण्यावरील मर्यादा रात्री 10 वरून 12 पर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
फॉर्मेलिनचा अजूनही वापर
मासळीमध्ये फॉर्मेलिनचा वापर अजूनही होत असल्याचा दावा आलेमाव यांनी केला. दक्षिण गोव्यातील घाऊक मासळी बाजारात आल्वा फर्नांडिस यांची नियुक्ती करून याबाबत मुख्यमंत्र्यांनी सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी त्यांनी केली. गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावातील मासळी बाजारांना भेट देऊन पाहणी केली आहे. येथे रांपणकार व बोटवाल्यांना सकाळी 9 नंतर मासळी विक्री करण्यास बंदी न घालता त्यांना दुपारी 12 पर्यंत मोकळीक द्यावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली.