ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितनुसार,शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हा फोन रविवारी आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे कंगना रनौतप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. कालच त्यांना हा फोन आला होता. हा फोन मात्र भारतातून आला होता.
मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना धमकीचा फोन आला होता. कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
- या प्रकरणी नीट चौकशी गरजेची : देवेंद्र फडणवीस
या प्रकरणाची नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कोणी जाणीवपूर्वक करत आहेत, या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. तसेच प्रशासनाने ज्यांना धमक्यांचे फोन आले आहेत त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.