प्रतिनिधी / दापोली
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे चक्रीवादळात पडलेल्या लाखो रुपये किमतीची झाडे पर्यायाने शासकीय मालमत्ता चोरीला गेल्याचा प्रकार दापोलीत उघडकीस आला. यानंतर तरूण भारतने केलेल्या बातमीची दखल घेवून उपविभागिय अभियंता जमिर पटेल यांनी सर्व सहाय्यक अभियंतांना 14 दिवसांत दापोली तालुक्यातील सर्व रस्त्यांवर चक्रीवादळात न पडलेल्या उभ्या झाडांच्या चोरीचा अहवाल सादर करण्याचे व यातील दोषींवर फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
निसर्ग चक्रीवादळात रस्त्यालगत असलेली बांधकाम विभागाच्या मालकीची झाडे मोठ्या प्रमाणात पडली. मात्र अनेक दिवस झाले तरी या झाडांचा लिलाव न झाल्याने लाखो रुपये किंमतीची झाडे चोरटे आता चोरून नेत होते. यावर तरूण भारतने वृत्त प्रसिध्द करताच प्रशासनाला जाग येवून त्यांनी या पडलेल्या झाडांचा लिलाव केला. यामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे बिनबोभाट उचलून नेण्याचा काही लोकांना प्ररवानाच मिळाला. मात्र याचा फायदा घेत या लाकूड तोड्यांनी रस्त्याच्या लगत असणारी झाडे देखील तोडून नेण्याचा सपाटा लावला. निसर्ग चक्रीवादळामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीची रस्त्यालगत असणारी झाडे ही या वादळात पूर्णपणे उन्मळून पडली.
यामुळे रस्ते बंद झाले होते. ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून लाकूड तोडयांची मदत घेण्यात आली. लाकूडतोड्यांनी त्यांची यंत्रसामग्री व मनुष्यबळ वापरून हे रस्ते मोकळे करायचे होते. याच्या मोबदल्यात लाकूडतोडे यांना रस्त्यावर पडलेली झाडे विनामूल्य मिळाली. हा तोंडी करार होता. मात्र रस्त्यालगत पडलेल्या व ज्याचा वाहतुकीला अडथळा होत नव्हता अशा अशा झाडांवर देखील या लाकूडतोड्यांनी डोळा ठेवून थोड्या दिवसांनी रस्त्यालगत पडलेली झाडे देखील उचलून न्यायला सुरुवात केली. यामुळे गावातील लोकांचे देखील चांगलेच फावले व गावातील लोकांनी देखील रस्त्यालगत पडलेली झाडे ही आपल्याच मालकीची असल्याचा गैरसमज करून ही झाडे तोडून देण्यास सुरुवात केली. यावर तरूण भारतमध्ये वृत्त प्रकाशीत होताच पडलेल्या झाडांचा लिलाव करण्यात आला.
मात्र याच वेळी रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी झाडे देखील तोडण्यात येत असल्याचे समजताच तरूण भारतने घटनास्थळी जावून या चोरट्यांचे व्हीडीओ शुटींग केले व याची बातमी केली. या आधारे येथील उपविभागिय अभियंता जमिर पटेल यांनी तालुक्यातील सर्व रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱया व लाकूड चोरट्यांनी तोडून नेलेल्या झाडांची मोजदाद करून त्यांची संख्या निश्चित करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. शिवाय ही झाडे कुणी तोडली याची चौकशी करून 14 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश उपअभियंत्यांना दिले आहेत. यामुळे तालुक्यातील चक्रीवादळात पडलेल्या झाडांच्या लिलावाच्या आड उभ्या झाडांची चोरी करणाऱयांचे धाबे दणाणले आहे.