मतदानाचा कल भाजपा आणि काँग्रेसच्याच बाजुने
प्रतिनिधी /वास्को
मुरगांव मतदारसंघात यंदाही भाजपा विरूध्द काँग्रेस असाच सामना रंगलेला आहे. मागच्या वेळी भाजपाला काटावरचा विजय प्राप्त झाला होता. यंदा पक्षाची आणि आमदाराचीही प्रतिमा डागाळल्याने आव्हान थोडे अधिकच जाणवले. त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा भाजपाला थोडय़ा जास्तच प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. यंदाचे आव्हान भाजपापेक्षा मिलिंद नाईक यांनीच अधिक स्विकारलेले आहे. वासनाकांडाच्या प्रकरणाने गाजलेला हा मतदारसंघ. सबंध गोव्याच्या नजरा मुरगाव मतदारसंघाच्या निकालाकडे लागल्यास नवल नाही.
भाजपाने मुरगावमध्ये पत्करलेला धोका सत्कारणी लागेल काय
मुरगाव मतदारसंघ मागच्या दहा वर्षांपासून सत्ताधारी आमदार व मंत्री राहिलेल्या मिलिंद नाईक यांच्यावरील विविध प्रकारच्या आरोपांनी गाजलेला आहे. काँग्रेसचे नेते आणि मिलिंद नाईक यांचे प्रतिस्पर्धी संकल्प आमोणकर यांनी आमदारांविरूध्द भ्रष्टाचाराचे विविध आरोप करून हे विषय ताणूनही धरले. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहिले. भाजपाविरोधी वातावरण कायम राहिले. मात्र, मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच्या मिलिंद नाईक यांना पराभूत करणे विरोधकांना जमलेले नाही. यंदाही पुन्हा तोच सामना मुरगावात रंगलेला आहे. यंदाची निवडणुक कथीत वासनाकांडाच्या पाश्वभूमीवर झाली. या प्रकरणात मिलिंद नाईक यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल की नाही याबाबत संशय निर्माण झाला होता. मात्र, भाजपाने धोका पत्करीत मिलिंद नाईक यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे यंदाच्या निवडणुक प्रचारात मिलिंद नाईक यांच्याविरूध्द वासनाकांडाचेच प्रकरण खळबळ उडवून देईल अशी शक्यता बळावली होती. मात्र, विरोधकांनी शेवटी निवडणुक प्रचारात सबुरीने घेत त्या कांडाचे भांडवल करण्याचे टाळले. त्यामुळे प्रचारातील सभ्यतेला डाग लागला नाही. मात्र, या प्रकरणाचा संदेश विरोधकांनी निवडणुक प्रचाराला अधिकृतरीत्या प्रारंभ होण्यापूर्वीच किंबहुना निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच घरोघरी पाहोचवला होता. त्याचा परीणाम मतदानावर किती प्रमाणात झाला हे निवडणुक निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
काँग्रेससमोर भाजपाविरोधी अन्य उमेदवारांचा धोका
मागच्या निवडणुकीप्रमाणेच भाजपाला मुरगावची निवडणुक जड जाणार असल्याची पाश्वभूमी निवडणुक प्रचारापूर्वीच तयार झाली होती. मात्र, मुरगावच्या निवडणुक रिंगणात बरेच उमेदवार उतरल्याने काहीशी चलबिचल सुरू झाली होती. तरीही या निवडणुकीत मिलिंद नाईक आणि संकल्प आमोणकर यांच्यातच सामना रंगला. मागच्या दोन निवडणुकांमध्ये संकल्प आमोणकर यांच्या विजयाआड दोन उमेदवार आले होते. त्यांचे अस्तित्व केवळ आमोणकर यांना पाडण्यासाठीच भाजपाच्या मिलिंद नाईक यांना उपयुक्त ठरले होते. यंदाच्या निवडणुकीतसुध्दा 8 उमेदवार होते. त्यापैकी दोन उमेदवार पूर्वाश्रमीचे संकल्प आमोणकर यांचे कार्यकर्ते होते. अन्य काही उमेदवारही काँग्रेसच्याच मतांवर डोळा ठेवून ठेवण्यात आल्याची चर्चा निवडणुक प्रचारा दरम्यान सुरू होती. काँग्रेसला मुरगावमध्ये अपयश आल्यास हेच उमेदवार सर्वस्वी जबाबदार ठरतील यात संशय नाही. काँग्रेसने मात्र, भाजपा किंवा मिलिंद नाईक विरोधी मते फुटणार नाहीत. ती काँग्रेसच्याच बाजुने वळतील असा ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे. दुसऱया बाजुने भाजपाच्या मतांवर डोळा ठेवून या मतदारसंघात एकही उमेदवार उभा राहिला नाही. त्यामुळे भाजपाची मते भाजपालाच पडतील असा व्होरा भाजपवाल्यांनी बांधलेला आहे. हा व्होरा किती खरा ठरतो याचे उत्तर निवडणुक निकालातच मिळेल.
निवडणुक अटीतटीची, भाजपा व काँग्रेसला विजयाचा विश्वास
सोमवारी झालेल्या निवडणुकीत मुरगांव मतदारसंघात 81 टक्के मतदान झाले. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात 79 टक्के मतदान झाले होते. हे मतदान मागच्या निवडणुकीपेक्षा 2 टक्क्यानी कमी आहे. यंदा 19,958 मतदारांपैकी 16,590 मतदारांनी मतदान केले. मागच्या वेळी विजयी उमेदवार मिलिंद नाईक यांना 8466 एवढी मते पडली होती. तर पराभूत उमेदवार संकल्प आमोणकर यांना 8326 एवढी मते पडली होती. मिलिंद नाईक यांचा एकूण 140 मतांनी विजय झाला होता. तो काठावरचा विजय होता. यंदाही खरी लढत काँग्रेसचे संकल्प आमोणकर आणि भाजपाचे मिलिंद नाईक यांच्यातच असली तरी मतदानाचा अधिक कल कुणाच्या बाजुने राहिल यांचा अंदाज घेणे कठीण आहे. मात्र, या उमेदवारांसाठी ही निवडणुक एकतर्फी झालेली नाही. राजकीय नेत्यांच्या नैतीक आणि अनैतिक वर्तनाचाही विषय या निवडणुकीत होता. मात्र, तरीही मतदारांवर या विषयाचा फारसा परीणाम झालेला नसल्याचे दिसून आले. मागच्या निवडणुकीसारखीच मुरगावची निवडणुक अटीतटीची झालेली आहे. मतदान संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसतर्फे विजयी होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. तरीही विजय कुणाचा हा लाख मोलाचा प्रश्न 10 मार्चलाच सुटणार आहे.