प्रतिनिधी/ काणकोण
खोतीगाव पंचायत क्षेत्रामधील केरी व नडके हे दोन जुळे वाडे आहेत. पारंपरिक शेती, गुरे-ढोरे यांचा सांभाळ करणाऱया येथील आदिवासी समाजातील मुले आज शिकून पुढे येत आहेत. मात्र आवश्यक मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध होत नाहीत अशी येथील लोकांची कैफियत आहे.
पूर्वी या समाजातील किमान एक व्यक्ती गुरांच्या मागे असायची, एखादी व्यक्ती पाणी आणण्यासाठी, एक व्यक्ती जेवणाच्या खोलीत आणि घर सांभाळण्यासाठी असायची. पुरुष मंडळी सकाळी जेवण घेऊन कामावर जायची. महिलावर्ग लाकूडफाटा गोळा करायला, भाजीपाला पिकवायला जायचा. आज ही परिस्थिती बदलली आहे. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून कामाला लागलेल्या आहेत. पूर्वीची गवताने शाकारलेली घरे जाऊन कौलारू घरे आली आहेत. डोंगराळ भागात नाचणी, भात, मिरचीची लागवड करून वर्षभर काबाडकष्टात जीवन घालविण्याचे दिवस आता संपले आहेत. वेळीप समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केल्यानंतर युवक शिकले, सरकारी नोकरीत लागले. प्रत्येकाच्या घरासमोर दुचाकी, चार चाकी वाहन आले आहे. या भागात भाताच्या, पिठाच्या गिरण्या आल्या आहेत. बऱयाच जणांचे राहणीमान बदलले आहे.
हलाखीचे जीवन
या सर्व गोष्टींचा विचार करता केरी गावातील ग्रामस्थ अजूनही हलाखीचे आणि कष्टप्रद असे जीवन जगत आहेत. नडकेपासून केरीपर्यंत चालत जायला किमान दोन तास लागतात. या वाडय़ावरील लोक भातशेती नडके येथे करतात. त्या ठिकाणी एकूण 13 घरे आहेत. आसपास मिळून 90 माणसे या ठिकाणी राहतात. अभयारण्याच्या कडक निर्बंधांमुळे या ठिकाणी जायला रस्ता नाही, वीज नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. दरवर्षी गोवा मुक्तीदिनी दीनदुबळय़ांच्या उद्धाराचे लांबलचक भाषण मुख्यमंत्री देतात. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात दीनदुबळय़ांसाठी खास पॅकेज असते. मात्र आमच्या मुलांनी काय पाप केले आहे, असा सवाल या वाडय़ावरील रेश्मा गावकर, सत्यवती गावकर या महिलांनी तसेच चंद्रहास वेळीप आणि खोतीगावचे पंच नागेश वेळीप यांनी आपल्या व्यथा कथन करताना उपस्थित केला.
आमच्या मुलांना शिकायचे आहे. काही वर्षांआधी केरी वाडय़ावरील नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न समोर आला होता. तालुका मामलेदारांनी त्याबाबतीत सर्वेक्षणही केले होते. लोकांची मते आजमावून घेतली होती. मात्र त्याची पुढे कार्यवाही झाली नाही. स्थानिक राजकारण्यांनी केवळ मतांचे राजकारणच केले. येथील लोकांच्या भावनांचा कधीच विचार केला नाही, असे मत या वाडय़ावरील शिक्षित युवक गणेश गावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना मांडले.
वीज, पायवाट द्या
नडके या ठिकाणी ज्या पद्धतीने वीजपुरवठा केला त्याच धर्तीवर भूमिगत वीजवाहिन्या टाकून घालून आम्हाला वीज द्या, सरळ चालू शकणारी अशी पायवाट द्या, अशा मूलभूत मागण्या या वाडय़ावरील नागरिकांनी केल्या आहेत. भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी लागणारे साहित्य आणि वीज खात्याचा तांत्रिक सल्लागार द्या. वाहिन्या टाकण्यासाठी खड्डे आम्ही स्वखर्चाने खोदून देऊ. सर्व साहित्य स्वखर्चाने डोंगरावर नेऊ. पायवाटही आम्ही स्वतः श्रमदानाने करायला तयार आहोत. फक्त परवानगी द्या, अशी हाक या वाडय़ावरील नागरिकांनी मारली आहे.
अधिकाऱयांनी कधीच लक्ष दिले नाही
मात्र दरवेळी अभयारण्याच्या नियमांवर बोट ठेवले जाते. या खात्याच्या अधिकाऱयांनी केरी असो अथवा नडके, या वाडय़ांवरील नागरिकांच्या समस्यांकडे गंभीरपणे कधीच लक्ष दिलेले नाही. वातानुकूलित खोल्यांत राहणाऱया या अधिकाऱयांनी स्थानिक पंचायत अथवा ग्रामस्थांनी पाठविलेले अर्ज, विनंतीकडे कधीच लक्ष दिलेले नाही, असा आरोप या वाडय़ावरील लोकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने पायवाट साफ करायचा प्रयत्न केला, वाटेवर असलेल्या ओढय़ावर साकव उभारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते प्रयत्न स्थानिक अधिकाऱयांनी हाणून पाडले. मुख्यमंत्री, स्थानिक आमदार, वनखाते, महसूल खाते, जिल्हाधिकारी आणि पंचायत या सर्वांनी एकत्र बसून यावर एव्हाना तोडगा काढायला हवा होता. परंतु आजवर ते घडलेले नाही. म्हणून अनुसूचित जमातींसाठी सरकारने ज्या सुविधा जाहीर केलेल्या आहेत त्यांचा लाभही मिळत नाही. आता नडकेवासियांच्या संघर्षाला साथ देत केरीवासीय देखील पुढे सरसावले आहेत. आमच्या नव्या पिढीला न्याय हवा आहे, असे या वाडय़ावरील नागरिकांनी सांगितले.