प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्मयात मोठय़ा संख्येने लोकांना धड पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. सांगे शहर, उगे भाग वगळता इतरत्र ठरावीक वेळेतच नळाला पाणी येते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मोफत पाणी देण्याच्या योजनेचा लोकांना किती फायदा होईल हे एक कोडेच आहे. ज्या घरांत कमी लोक राहतात त्यांना ते फायद्याचे आहे. ज्यांचे कुटुंब मोठे आहे त्यांना ते फायद्याचे नाही, अशा प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. मोफत पाण्यापेक्षा जुने दरच परवडणारे आहेत, असे बोलले जात आहे.
मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास भुर्दंड
सोळा हजार लिटर पाणी मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यापेक्षा जास्त पाणी वापरल्यास त्याचा ग्राहकांना भुर्दंड पडणार आहे. सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र असलेले ‘पाणी कमी वापरा, पाणी मोफत मिळवा’ अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ कमी पाणी वापरणाऱयांना फायदा होणार हे नक्की. घरात दोन ते तीनच माणसे असल्यास त्यांना फायदा होईल. मोठय़ा कुटुंबांना फायदा होईल असे वाटत नाही. एकूणच पाणी कमी वापरा, पाणी मोफत मिळवा हे गणित आपल्याला समजलेले नाही. अनेक ठिकाणी पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाते. त्वरित बिघाड दुरुस्त केला जात नाही.
– रूमाल्डो फर्नांडिस, नगरसेवक, सांगे पालिका
बहुतेकांना फायदा नाही, उलट बिल वाढणार
सोळा हजार लिटर पाणी मोफत हे ऐकायला बरे वाटते. पण त्याचा सर्वांनाच फायदा होणार नाही. त्यापेक्षा पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्याची गरज आहे. पाणी मोफत देण्याचा हा प्रकार म्हणजे हातचलाखीचा भाग आहे. सरकारने खेळलेली ही एक जादू आहे. दिल्लीत जशी वीज फुकट तसे गोव्यात सोळा हजार लिटर पाणी फुकट. दिल्लीचे थोडेफार समजू शकतो. पण मोफत पाणी योजनेमुळे सोळा हजार लिटरहून जास्त पाणी वापरणाऱयांचे खोबरे होणार आहे. या निर्णयामुळे काही लोकांचे भले होणार. मात्र बहुतेक लोकांना फायदा होणार नाही. उलट पाण्याचे बिल वाढणार. जो जास्त पाणी वापरतो त्यांना यात फायदा दिसून येत नाही. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना गृह आधार योजनेच्या अर्थसाहाय्यात 500 रुपये वाढ करण्याचा विचार पुढे आला असता आपण वीज आणि पाणीबिलात सूट देण्याची मागणी केली होती. आज 50 युनिट वापरणारा 337 रु. भरतो. यापुढे त्याला 465 रु. भरावे लागतील. त्यामुळे पाणी मोफत यात काहीच विशेष नसून इकडचे तिकडे असा प्रकार आहे.
– गुरुनाथ नाईक, दांडो-सांगे गुरुनाथ नाईक
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
आपण या निर्णयाचे स्वागत करतो. मुळात सांगेतील ग्रामीण भागांत कमी वेळ पाणी मिळते. त्यामुळे लोक पाणी मर्यादित वापरतात. पाणी वाया घालवत नाहीत. कारण जे पाणी मिळते ते तोलून मोलून वापरावे लागते. ग्रामीण भागांत सर्वाधिक लोक सरकारी शौचालयांचा वापर करतात. तेथे फ्लश सुविधा नसते. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला फायदा होणार आहे. मात्र पाणी येण्यापूर्वी जो वारा निघतो त्याद्वारे मीटर चालतो. तसेच पाण्याच्या गळतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– मनोज पर्येकर, पंच, भाटी पंचायत मनोज पर्येकर