तब्बल 30 लाखांचे 41 मोबाईल जप्त / मुंबई, युपीतील 12 संशयितांना अटक
प्रतिनिधी / पणजी
कळंगुट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला असून, तब्बल बारा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमंतीचे 41 महागडे मोबाईल जप्त केले आहेत. त्याशिवाय 8 ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज तसेच दोन महागडय़ा कार जप्त केल्या आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
संशयितांच्या विरोधात भादंसंच्या 356 व 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. सनबर्न पार्टीत येणाऱया पर्यटकांना लुटण्याचा त्यांचा बेत होता, असे तपासात उघड झाल्याचे वाल्सन यांनी सांगितले. काल गुरुवारी पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बाराही संशयित मुंबई, उत्तर प्रदेशचे
अटक केलेल्या संशयितांमध्ये झ्योएब शेख इक्बाल (32, पूर्व मुंबई), सनी यादव (पूर्व मुंबई), प्रमोद राजेंद्र यादव (29, उत्तर प्रदेश), महम्मद अदनाम शेख (24, पूर्व मुंबई), श्याम रमाकांत बर्नवाल (29, अंधेरी पश्चिम मुंबई), महम्मद नदीम अब्दुल अन्सारी (29, सांताप्रुझ पूर्व मुंबई), अल्ताफ हुसेन (29, पूर्व मुंबई), नादीर अब्दुल कुरेशी (29, सांताप्रुझ, मुंबई), ब्रिजेश उदयलाल पालीवाल (24, वसई, पालघर), दिवाकर श्रीवास्तव (23, पश्चिम मुंबई), भानू प्रताप सिंग (31, पश्चिम मुंबई), किरण सुखदेव (30, पूर्व मुंबई) यांचा समावेश आहे.
सनबर्नमध्ये मोबाईल लुटण्याचा बेत फसला
सनबर्न पार्टीत गर्दी असते आणि अधिकाधिक लोक नशेत धुंद असतात याची संशयितंना कल्पना होती. त्याचाच फायदा घेऊन पार्टीत येणाऱया पर्यटकांना लुटण्याच्या तयारीत संशयित होते. मात्र त्यांचा तो बेत फसला आणि संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. बागा येथील एक हॉटेलात ते राहिले होते. संशयित आलिशान कारने फिरत होते. सनबर्न पार्टीची तिकिटेही त्यांनी काढली होती. त्यामुळे हे भूरटे चोर नसून एक मोठी संघटीत टोळी असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
केवळ एका तक्रारीमुळे झाला पर्दाफाश
पुणे येथील जीतेश मेहता पर्यटक म्हणून गोव्यात आले होते. सनबर्न पार्टीच्या ठिकाणी चोरटय़ाने आपला मोबाईल हिसकवून नेल्याची तक्रार त्यांनी कळंगुट पोलीस स्थानकात दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार नोंद करून याबाबत तपासकामाला सुरुवात केली. ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असता संशयितांची ओळख मिळाली, पोलिसांनी ते ज्या हॉटेलात राहत होते त्या हॉटेलात जाऊन संशियातांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 41 मोबाईल मिळाले. हे मोबाईल कुठून चोरी केले त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
कळंगूट पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मळीक, हवालदार विद्यानंद आमोणकर, विशाल गावस, कॉन्स्टेबल विजय नाईक, अमीर गरड, गणपत तिलोजी, महेंद्र चारी, संज्योत केरकर, रुपेश साळगावकर, स्मितल बांदेकर, अक्षय कामुर्लेकर, प्रीतेश किनळेकर, भगवान पालयेकर, आकाश नाईक, लक्षमण पटेकर, वाहनचालक हवालदार मनोज शिंदे व कॉन्स्टेबल सर्वेश तुयेकर यांनी ही कारवाई केली.