अध्याय तेरावा
भगवंत सनकादिकांना समजावून सांगत आहेत की, मीतूपण असं वेगवेगळं काहीही नसून सर्वकाही त्यांनीच व्यापलेलं आहे. ते म्हणाले, सर्वांच्या अंतरात्म्यात आत्मस्वरूपाने राहणारा मीच आणि देह चालवणाराही मीच पण जे भ्रांतिष्ट असतात ते हा पंचमहाभूतात्मक देहाचा गोळा माझ्याहून निराळा आहे असे समजतात. पण सर्वव्यापक अशा मला सोडून तो निराळा कोठे राहू शकेल?
ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटा पाण्याच्याच स्वरूपाने पाण्यात मजेत खेळत असतात, त्याप्रमाणेच माझ्या स्वरूपामध्ये अनेक देह वसलेले आहेत. तुप थिजून घट्ट झाले तरी ते तूपपणापासून वेगळे नसते. त्याप्रमाणे पाण्यामध्ये पाण्याचीच गार साकार आहे अशी भासते. त्याप्रमाणे माझ्यामध्येच हे चराचर उत्पन्न झाले आहे, असे भासते. पण ते माझ्या स्वरूपापासून वेगळे नसते. ज्याप्रमाणे एक धागा सुतानेच सुताच्या आत विणलेला असला तरी त्याला वेगवेगळे धागे असे म्हणतात, त्याप्रमाणेच माझ्यामध्ये जग भासते.
फक्त धाग्याचा विचार केला तर वस्त्र दिसत नाही. त्याप्रमाणे आत्म्याला पाहू लागले असता जग नाहीसे होते. अशा दृष्टीने पाहिले असता सर्व ब्रह्मव्याप्त आहे, अशी खात्री पटते. अशा ऐक्मयभावाने मीच एक सर्वात्मा व सर्वात्मक आहे हा विचार निश्चयपूर्वक बुद्धीने निःसंशय जाणावा.
सर्व ठिकाणी मीच एकमेव आहे हाच दृढ निश्चय धरणारा जागच्या जागीच नित्य मुक्त होतो. सर्वत्र भरलेला आत्मा चैतन्यस्वरूप आहे असे जाणणे हे आत्मज्ञान अत्यंत सुलभ आहे. उद्धवा! हे सांगून सनकादिकांच्या मनातले मीतूपण मी घालवले. सनकादिकांनी चित्त आणि विषय वेगवेगळे कसे करायचे, हा पूर्वी विचारलेला प्रश्न ब्रह्मदेवादिकांनासुद्धा अडचणीत पाडणारा होता. त्याचेही उत्तर मी विवरण करून त्यांना सांगितले. मी म्हणालो, हे पुत्रांनो! चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासनारूपाने राहतात. परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणाऱया जीवाचे देह आहेत. तुम्ही ब्रह्मदेवाला म्हणत होतात की, चित्तामध्ये विषय शिरले किंवा चित्त विषयात शिरले की, ते काही निराळे करता येत नाहीत आणि विषयत्याग केल्याशिवाय ब्रह्मज्ञान तर कधीच होत नाही. तेव्हा विषयत्याग कसा करता येतो ते पूर्णपणे सांगा. त्यावर मी तुम्हाला असे सांगतो की, चित्त आणि विषय हे काही जीवाचे आत्मस्वरूप नव्हे. ही दोन्ही वासना किंवा इच्छेमुळे देहाला चिकटलेली आहेत. मनुष्य स्वतःला कर्ता समजत असल्याने हे घडते. मी कर्ता असून माझ्या कर्तृत्वाने मला विषय उपभोगायला मिळतात, अशा विचाराने अंतःकरण विषयी झालेले असते. त्यामुळे अहंकार उसळून उठतो आणि विषयांच्या नादाला लागून चित्ताला भुलवतो. चित्त भुलले की मनुष्य आत्मस्वरूपाला विसरतो. आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने जीव आणि मन यांचे तादात्म्य दृढ होते.
जर चित्त जीवाचे स्वरूप असते, तर ते विषयावर लुब्ध झाले नसते. जीव आत्मस्वरूपाला विसरला असल्याने उपाधि अभिमानाने वाढवत असतो. नित्य, शुद्ध, मुक्त आणि ज्ञानरूप असे जीवाचे स्वरूप आहे. पण अहंकारामुळे हे मिथ्या बंधन त्याने मागे लावून घेतलेले असते. याकरिता अभिमान सोडून द्यावा, तेव्हाच सर्व बंधन तुटते आणि तो अभिमान जाण्याकरिता माझे भजन करावे. परंतु वैराग्याशिवाय माझी भक्ती खरोखर पोचटच आहे. वैराग्य म्हणजे संपूर्ण निरिच्छ अवस्था होय. म्हणून वैराग्यासहवर्तमान जेव्हा माझी भक्ति उत्पन्न होते तेव्हा हृदयामध्ये विषयाचे अस्तित्व मुळीच रहात नाही आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे ही भावना दृढ होते. असं झालं की, जीवाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. हीच वैराग्ययुक्त भक्ति होय. ती प्राप्त होईल तेव्हाच माझ्या स्वरूपात जीवाचा प्रवेश होईल. खरे म्हटले तर जीव हा मत्स्वरूपीच आहे. पण त्याला देहाभिमान पोसत असतो. याकरिता सदासर्वदा प्राणिमात्राच्या ठायी माझीच भावना ठेवली असता आपोआपच मत्स्वरूप प्राप्त होते. जीवाला मत्स्वरूप प्राप्त झाले की, विषय व चित्त या दोघांचाही सहजी त्याग घडतो. क्रमशः