प्रतिनिधी/रत्नागिरी
पाच दिवसांपासून पावसाने दडी मारणाऱया पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्य़ात पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रूसलेला ‘म्हातारा’ हसल्याची चर्चा शेतकऱयांमध्ये सुरू आहे. दरम्यान, शनिवार व रविवारी किनारपट्टी भागात सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आठवडाभरापूर्वी जिल्ह्य़ात धुमशान घालणाऱया मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले होते. पुष्य अर्थात ‘म्हातारा‘ नक्षत्रात सर्वत्र पाऊस धुमाकुळ घालतो. पण या नक्षत्राची सुरूवातच कोरडी गेल्याचे दिसून येत होते. त्यात श्रावण सुरू झाल्याने कडाक्याचे ऊन्हामुळे काहीली सुरू झाली होती. पावसाने दडी मारल्याने ‘म्हातारा’ रूसल्याची चर्चा शेतकऱयांमध्ये सुरू होती.
जिह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 1.64 मिमी तर एकूण 14.80 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये मंडणगड 0.50 मिमी, दापोली निरंक, खेड 0.30 मिमी, गुहागर 2.00, चिपळूण 0.70 मिमी, संगमेश्वर 1.30 मिमी, रत्नागिरी 3.30 मिमी, राजापूर 3.70 मिमी, लांजा 3.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘म्हातारा’ नक्षत्रात पाऊस कोरडा जातो की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती. पण शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळपासूनच जिल्हाभरात आभाळ पावसाने दाटून आलेले होते. सकाळपासूनच ठिकठिकाणी जोरदार सरी कोसळू लागल्या होत्या. दुपारपासून या पावसाचा जोर अधिकच वाढून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. गेले आठवडाभर दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने साऱयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्य़ातील 41 धरणे 100 टक्के भरली
जिह्यात सुरूवातीपासून पडलेल्या पावसाने येथील नदय़ांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली होती. जिल्हय़ातील धरण साठय़ात देखील समाधानकारक पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात असलेल्या अनेक धरण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे. जिल्य़ातील मध्यम धरण प्रकल्प असलेल्या गडनदी, अर्जूना हे धरणप्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर मंडणगड- पणदेरी, भोळवली , दापोली- सिरसाडी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, पंचनदी, खेड- शिरवली, शेल्डी, कोंडिवली, पिंपळवाडी, तळवट, कुरवळ, गुहागर- गुहागर, चिपळूण- फणसवाडी, मालघर, कळवंडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, असुर्डे, संगमेश्वर-तेलेवाडी, कडवई, निवे, गडनदी, रांगव, रत्नागिरी-शिळ, लांजा- शिपोशी, व्हेळ, गवाणे, बेणी, केळंबा, झापडे, मुचकुंदी, हर्दखळे, इंदवटी, त्याचबरोबर राजापूर-दिवाळवाडी, बारेवाडी, ओझर, गोपाळवाडी, वाटूळ हे लघू धरणप्रकल्प देखील 100 टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. रत्नागिरी, चिपळूण दापोली, खेडसह सर्वच तालुक्यांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाच्या कडाक्यात अनेकांना दिलासा मिळाला. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे. काही गावांमध्ये खोळंबलेली लावणीची कामेही त्यामुळे सुरळीत होणार आहेत.