सोशल मीडियावरून वाहतेय शब्दसरिता
प्रतिनिधी/पणजी
म्हादईचे पाणी वळवून गोमंतकीयांच्या तोंडचे पाणी पळविण्याबरोबरच येथील निसर्ग आणि संस्कृतीचाही ऱहास करण्यास पुढे सरसावलेल्या केंद्र आणि राज्यातील राजकारण्यांच्या राजकीय खेळीमुळे येथील साहित्यिक, कवी, लेखक, निर्माते यांच्या अस्वस्थतेत कमालीची भर घातली आहे. त्यापैकी अनेकांनी शब्दांच्या माध्यमातून ही अस्वस्थता आणि संतापाला वाट मोकळी करून देतानाच म्हादईच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न केले. त्यासंबंधी प्रत्येकाच्या सर्जनशिलतेचे अनेक नमुने सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बहुचर्चित काळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्राने मंजुरी दिल्याची घोषणा केल्यापासून साहित्यिकांनी सोशल मीडियावर कथा, कविता, माहितीपट आदी सर्जनशील साहित्य पोस्ट करून आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा उफाळून येताच अनेकांनी माहितीपट सुद्धा तयार करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याद्वारे म्हादईचे पाणी वळविल्यास राज्यावर कसा परिणाम होईल यासंबंधी जागृती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.
म्हादई ही केवळ एक नदी नाही. ती गोव्याची जीवनदायिनी आहे. तिच्यावर पोसल्या जाणाऱया वनचर, जलचर, आदी अब्जावधी जिवांचा ती प्राण आहे. निसर्गाचा ती श्वास आहे. अशा म्हादई मातेचे आज दिल्लीतील सत्ताधाऱयांनी वस्त्रहरण चालविले आहे. हेच दुःख या कवी, लेखकांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहे.
तसे पाहता नद्यांचा गळा घोटणे यात दिल्लीश्वरांना नाविन्य वाटत नाही. त्यांची पवित्र पावन यमुना नदी प्रदुषणामुळे गुदमरत आहे. अक्षरशः अखेरच्या घटका मोजत आहे. त्याच प्रमाणे तपस्वीनी गंगा नदीचेही प्राण गळ्यापर्यंत आलेले आहेत. तिच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने कोटय़वधीचा निधी मंजूर केला, त्यावरून गंगा नदी प्रदुषणाच्या विखाळ डोहात कशी गटांगळ्या खात आहे त्याचा दाखला मिळतो.
या दोन्ही नद्यांच्या रक्षणाचे गांभीर्य नसलेल्या केंद्र सरकारने म्हणुनच म्हादईप्रती गोमंतकीयांच्या भावभावना, तिचे महत्व यापैकी कशाचीही तमा, फिकीर, चिंता, कदर न करता कर्नाटकाच्या मनमानीपणाला आशिर्वाद दिले आहेत. हा संताप या कवी, लेखकांच्या साहित्यातून दिसून येत आहे.
राजकारण्यांनी म्हादईप्रश्न गांभीर्याने घ्यावा : वेरेकर
त्यासंबंधी आपला संताप व्यक्त करताना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी संजीव वेरेकर म्हणतात, येथील राजकारण्यांना म्हादईपेक्षा राजसत्तेत जास्त रस आहे. मात्र, आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. अशावेळी आम्ही एकजुटीने उभे राहिलो तर म्हादईच्या पाण्याचा थेंबही वळवण्याची कुणाची हिंमत होणार नाही. त्याही परिस्थितीत या विषयावर कवी, लेखकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली हे चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.
म्हादईच्या लढय़ात प्रत्येकाने सहभागी व्हावे : परब
आज प्रत्येकाला पाण्याची गरज आहे हे चिरंतन सत्य आहे. परंतु आपली भूक भागविण्यासाठी दुसऱयाच्या पुढय़ातील भरलेले ताट खेचून घेणे योग्य नाही. हे निसर्ग नियमात बसणारे नाही. कर्नाटकाने चालविलेला आतताईपणा घातक आहे. त्यामुळे आपले वन्यजीव, वनराई आणि पर्यावरण नष्ट होईल. ही भीती मी काव्यात्मक व्हिडिओद्वारे दाखवून त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते साईनाथ परब यांनी व्यक्त केले.
त्यासंदर्भात कवयित्री ग्वादलूप डायस यांनी रचलेल्या कवितेतून म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याचे कसे आणि किती नुकसान होईल ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे परब यांनी पुढे सांगितले. म्हणुनच म्हादईच्या या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाणी वळविल्यास नैसर्गिक ऱहास : पालकर
म्हादईसंदर्भात जनजागृती करणे खरोखरच आवश्यक होते. पाणी वळविल्यास एकुणच गोमंतकीय लोकजीवनावर कसा परिणाम होईल याची जाणीव माहितीपटाच्या माध्यमातून दाखविण्याचे आपण प्रयत्न केले आहेत, अशी माहिती ’म्हादई-लाईफलाईन ऑफ गोवा’ या नावाने माहितीपट बनवणारे अभिनेता आणि दिग्दर्शक आकाश पालकर यांनी दिली.
या माहितीपटाच्या चित्रणासाठी आपण प्रत्यक्ष म्हादईच्या उगमस्थळास भेट दिली, त्यावेळी तिच्या तिरावरील अनेक गावे याच पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले. तेथील शेती, बागायतीही म्हादईशिवाय फुलू शकणार नाहीत. पशुपक्षांची तहान-भूक म्हादईशिवाय भागणार नाही, हेही सत्य जाणवले. अशावेळी पाणी वळवल्यास कशाप्रकारे नुकसान होईल, याचेही भयाण चित्र नजरेसमोर आले, असे पालकर म्हणाले.
नजरेसमोर येते भकास, भयाण चित्र : प्रकाश नाईक
प्रकाश नाईक या हळव्या मनाच्या कवीने तर म्हादईचा विषय खूपच मनाला लावून घेतला आहे. ’सध्या आपले कवीमन खिन्न आणि सुन्न बनले आहे. लेखनाला खीळ बसली आहे. क्षणोक्षणी केवळ म्हादईच आठवते. गोव्याचे भयाण, भकास, भयानक, भयंकृत, अंधःकारमय भवितव्य समोर दिसते आहे’, असे ते म्हणतात.
कपिल सरदेसाईंची म्हादईला हाक
कपिल सरदेसाई या कवीने खुद्द म्हादईलाच साद घातली आहे. ते म्हणतात, हे म्हादई माते, जे तुला त्रास करतात, वक्रदृष्टीने पाहतात त्यांचा अहंकार लयास ने. तुझ्यावर होणारे अन्याय सहन होत नसेल तर गोमंतकीयांना हाक मार, ते सर्वजण तुझ्या हाकेला धाऊन येतील. पण या गोव्याच्या भूमीवरून वाहणे सोडू नकोस, तुझ्या दुश्मनांच्या माथी कायद्याची लाठी हाणून स्वतःची अस्मिता सिद्ध कर.