टीएमसीचे समन्वयक समिल वळवईकर यांची टीका : आझाद मैदानावर आंदोलन
प्रतिनिधी /पणजी
गोव्याची जीवनदायीनी म्हादई नदीवर अन्याय करून ’भाजप सरकारने गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे. भाजपला केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याची चिंता आहे. त्यातूनच ते निवडणूक राजकारणासाठी गोवा विकत आहेत, असा गंभीर आरोप गोवा टीएमसीचे समन्वयक समील वळवईकर यांनी केला आहे.
म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या विरोधात बुधवारी गोवा टीएमसीतर्फे पणजीतील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी संयुक्त संयोजक मारियानो रॉड्रिग्स, उत्तर गोवा अध्यक्ष राजेंद्र काकोडकर, जोर्सन फर्नांडीस, सरचिटणीस राखी प्रभुदेसाई नाईक, माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो, एन शिवदास आदी नेते उपस्थित होते.
पुढे बोलताना वळवईकर यांनी, म्हादईच्या रक्षणासाठी राजेंद्र केरकर आणि निर्मला सावंत यांनी केलेली समर्पित सेवा आणि म्हादईचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याऊलट भाजपच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने मात्र गोव्याचे पर्यावरण आणि जलस्रोत नष्ट केल्याबद्दल त्यांनी जोरदार टीका केली. हे सरकार मतांसाठी विकत असलेल्या म्हादईला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ट्रोजन डिमेलो यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सरकारने 2012 पासून गोव्याचा नाश केला आहे. या सरकारच्या खाणंबदी निर्णयामुळे लाखो गोमंतकीय बेरोजगार झाले. याच सरकारने कॅसिनो आणले. कोळशाचे प्रदूषण करणारे डबल ट्रकिंग प्रकल्प आणताना गोव्यातील नद्यांचा ताबा केंद्राकडे सोपवला, अशाप्रकारे गोव्याची नासाडी केली. हेही कमी होते म्हणून की काय आता ते म्हादईचा गळा घोटू पाहात आहेत, असे आरोप डिमेलो यांनी केले.
डॉ. फर्नांडीस यांनी बोलताना, म्हादईचा प्रवाह वळविल्यास गोव्याच्या संवेदनशील पर्यावरणाला हानी पोहोचेल आणि पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी असलेल्या पाणी पुरवठय़ावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गोव्याला म्हादई आणि तिच्या उपनद्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
राखी प्रभुदेसाई यांनीही भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2022 मध्ये ’हर घर जल’ चा खोटारडेपणाचा जुमला करणाऱया या सरकारने आता कर्नाटक विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेऊन म्हादई नदी कर्नाकच्या हवाली करण्याचा विडा उचलला आहे. हा एक पूर्वनियोजित कट आहे, असे त्या म्हणाल्या.
अन्य नेत्यांनीही यावेळी विचार मांडले. सभेस राज्याच्या विविध भागातून आलेले पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.