मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुनरुच्चार
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईप्रश्नी जी काही बोलणी होईल ती न्यायालयातच होईल. न्यायालयाबाहेर कोणतीही चर्चा अथवा तडजोड आम्ही करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर ठाम आहोत. आधी पाणी सोडा, नंतरच चर्चेस या, अशी भूमिका आम्ही कर्नाटकसमोर स्पष्ट केलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्नाटकाचे केंद्रीय निरीक्षक शंकरगौडा पाटील यांनी आपल्या भेटीत म्हादईसंबंधी विषय काढला होता, परंतु आपण त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचा कर्नाटकातील आमदार तथा गोवा प्रभारी सी. टी रवी यांच्यासमोरही आपण भूमिका स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणूक डिसेंबरमध्ये
राज्यातील जिल्हा पंचायतीची स्थगित झालेली निवडणूक पुढील महिन्यात होणार असून नाताळपूर्वी त्या घेतल्या जातील, त्यासंबंधी राज्य निवडणूक आयोगास आदेश दिलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
लोकभावनांचा आदर ठेऊन आमदार आंदोलनात
कोळसा वाहतूक आणि रेल्वे डबल ट्रेकिंगला आतापर्यंत विरोधकच विरोध करत होते, परंतु सध्या सत्ताधारी पक्षातील काही आमदारही विरोध करू लागले आहेत, त्यासंबंधी विचारले असता लोकभावनांची कदर ठेऊन त्यांना आंदोलनात उतरावे लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला लोक निवडून देतात आणि आता पुन्हा त्याच लोकांसमोर मते मागण्यासाठी जायचे आहे, त्यामुळे लोकांच्या भावना समजून घ्याव्याच लागतात, व त्यांचा आदर हा केलाच पाहिजे, त्याला आपला कोणताही विरोध नाही, असे ते पुढे म्हणाले.
बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मोलेतील तामनारा वीज प्रकल्पाचा विषय काढला व त्याचे जोरदार समर्थन केले. हा प्रकल्प न झाल्यास पुढील दीड दोन वर्षात गोव्याला विजेसाठी प्रचंड हाल सहन करावे लागतील, असे ते म्हणाले. अशा प्रकल्पांना विरोध करणाऱयांपैकी काही जणांचा निवडणूक अजेंडा आहे, काही शक्तींचा अजेंडा हा केवळ विरोध करणे एवढाच आहे, त्यांना कितीही समजावले तरी ते समजत नाहीत, ज्यांना आमचे म्हणणे पटते ते विरोध सोडून बाजूला होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डबल ट्रेकिंग पुढे न्यायचे की नाही हा विषय आपण केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडलेला आहे. कोळसा 50 टक्के कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळास आदेश दिला आहे. पुढील आठ दहा दिवसात अहवाल सादर करणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री दिल्लीला रवाना
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीस रवाना झाले असून गोव्यात सध्या गाजत असलेल्या म्हादई, कोळसा, खाणी, रेल्वे दुपदरीकरण या महत्वाच्या विषयांवर ते केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गोवा राज्यात वरील विविध विषयांवरून जनतेत रोष निर्माण झाला असून आंदोलने चालू आहेत. सत्ताधारी भाजपचे काही आमदारही सहभागी होत आहेत. या प्रकरणी त्वरित तोडगा काढावा अशी मागणी ते केंद्र सरकारकडे पर्ययाने केंद्रीय मंत्र्यांकडे करतील अशी माहिती सुत्रांनी दिली.