चार महिन्यांपासून अवजड वाहतूक ठप्प : वळसा घालून जावे लागत असल्याने शेतकऱयांतून संताप : रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
अतिपावसाने जुलै महिन्यात वाहून गेलेल्या म्हाळेनट्टीच्या रस्त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्याने गावातून मुख्य रस्त्यापर्यंत येणे अडचणीचे बनले आहे.
हंदिगनूर-बेळगाव मार्गावर म्हाळेनट्टी गावात जाण्यासाठी एक किलोमीटरचा अरुंद रस्ता आहे. हा रस्ता जोरदार पावसामुळे पावसाळय़ात वाहून गेला आहे. मात्र, अद्यापही याकडे दुर्लक्ष झाल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली आहे. गावाला सकाळ-संध्याकाळ अशी दोनवेळा बस फेरी मारत होती. मात्र, रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने बस बंद झाली आहे. परिणामी नागरिकांना पायी चालतच मुख्य रस्ता गाठावा लागत आहे.
हंदिगनूर-बेळगाव मार्गावरील म्हाळेनट्टी गावाकडे जाणारा रस्ता पुलाजवळ पूर्णपणे खचल्याने अवजड वाहतूक चार महिन्यांपासून बंद आहे. गावकऱयांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असून शिवारातून मार्ग काढावा लागत आहे. काहीवेळा हंदिगनूरला वळसा घालून बेळगावला यावे लागत आहे. इतकी बिकट परिस्थिती असूनदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणाचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वाहून गेलेल्या रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद असली तरी दुचाकीधारक धोका पत्करून वाहने चालवत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची चिंता व्यक्त होत आहे. जुलै महिन्यात वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत
आहे.
ऐन सुगी हंगामात रस्ता बंद
रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद झाल्याने ऐन सुगी हंगामात शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीमाल बाजारात आणणे शेतकऱयांना अडचणीचे झाले आहे. गावात अवजड वाहतूक जाणे बंद झाल्याने शेतीमाल घरीच पडून आहे. बटाटा, भुईमूग, रताळी एपीएमसीला आणणे अडचणीचे झाले आहे. त्याबरोबर सध्या सुगी हंगामातील मळणी केलेले भात विक्रीसाठी बाजारात आणणे अवघड बनले आहे.
रस्ता खचल्याने शेतीचे नुकसान
पावसाने रस्ता वाहून गेल्याने शेजारी असलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता वाहून जाऊन भातशेती मातीखाली सापडली होती. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. गतवषीदेखील पावसाळय़ात हीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱयांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.