जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई, पलूसमधील कृषी उद्योग समूहावरही गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील म्हैसाळ येथे खत निर्मिती करून पलूसमधील कृषी उद्योग समूहाच्या सहाय्याने खतांची विनापरवाना विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. म्हैसाळ येथे सुरू असलेल्या या बोगस खत कारख्यान्यावर छापा टाकून 19 लाखांचा खतसाठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. बोगस कारखान्याद्वारे खतांचे उत्पादन करून ते शेतकऱ्यांना विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खत कारखाना चालक शिवलिंग संगाप्पा सनबे (रा. म्हैसाळ) आणि पलूस येथील सरिता कृषी उद्योग समूहावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील हे शुक्रवारी 30 ऑक्टोबर रोजी पलूस येथील सरिता कृषी उद्योग समूह या दुकानाची नियमित पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सदर दुकानाचा खत विक्री परवाना मुदतबाह्य असल्याचे दिसून आल्याने त्यांनी दुकानाची झडती घेतली. यावेळी रासायनिक खतांच्या पोत्यावर शासनाने विहित केलेला मजकूर नव्हता. तसेच विक्रीबाबतचा ओ-फ़ॉर्मही नव्हता. त्यामुळे रासायनिक खते कोणत्या कंपनीची आहेत, याची चौकशी केली असता सदरची खते म्हैसाळ येथील तुषार प्रॉडक्ट्स कंपनीचे असल्याचे स्पष्ट झाले.
गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशिराने म्हैसाळ येथील तुषार प्रॉडक्ट्स या खत उत्पादन कंपनीवर छापा टाकला. त्यावेळी कारखान्यात विविध खतांची 2 हजार, 459 पोटी, 11 कॅन, 110 बकेट, 156 लिक्विडच्या बाटल्या असा 18 लाख, 78 हजार, 225 रुपयांचा खतसाठा मिळून आला. कारखाना चालक शिवलिंग सनबे यांच्याकडे परवाना नव्हता. तरीही कारख्यानात खतांचे उत्पादन करून शासनाचा कोणताही मजकूर नसलेल्या पिशव्यांमधून खत विक्री सुरू होती. त्यामुळे सुरेंद्र पाटील यांच्या आदेशाने कारखान्यातील सर्व खतसाठा जप्त करण्यात आला. या कारख्यानातून जिल्ह्यात आणखी कोणत्या कृषी केंद्रामध्ये निर्यात झाली आहे, या रॅकेटमध्ये कोण-कोण सहभागी आहे, याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
” खत उत्पादक व विक्रेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा. सर्व प्रकारच्या परवान्यांचे नुतनीकरण करून घ्यावे. विनापरवाना अथवा बेकायदेशीर काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.”
– सुरेंद्र पाटील
गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हा परिषद कृषी विभाग, सांगली