मागासवर्गीयांसाठी 11 राखीव गाळय़ांना बोली नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
बाजारपेठेतील महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यास आक्षेप घेण्यात आला. मात्र, नाटय़मय घडामोडींनंतर दुपारी अनामत रक्कम भरण्यास व्यावसायिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे 61 गाळय़ांपैकी 50 गाळे लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या करिता प्रति दिन 340 रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्यामुळे काही गाळय़ांच्या भाडय़ाची रक्कम महापालिकेच्या अपेक्षेपेक्षा चार पटीने जास्त आली आहे.
महात्मा फुले भाजी मार्केटमधील 59 गाळे व दोन गोडावून भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी लिलाव आयोजित केला होता. पण सदर जागा वक्फ बोर्डची असल्याचे सांगून लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करून आक्षेप घेण्यात आला होता. पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा दावा करून यापूर्वीच्या गाळेधारकांनी आंदोलन छेडले होते. मात्र, सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. तरीदेखील लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यास कोणीच तयार झाले नाहीत. मात्र, दुपारच्या सत्रात लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे लिलावात 80 लोकांनी भाग घेतला होता. सर्व व्यावसायिकांची अनामत रक्कम भरून घेण्यास उशीर झाल्याने रात्री 8 वा. लिलाव प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला.
लिलाव प्रक्रियेत बोली लावण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या भाडय़ापेक्षा जादा दराने बोली लावण्यात आली. महापालिका प्रशासनाने प्रतिदिन 88 रुपये भाडे निश्चित केले होते. काही गाळय़ांकरिता 150 रुपयेपर्यंत बोली लागली. काही गाळय़ांसाठी 250 ते 340 रुपयापर्यंत बोली लागली. प्रति महिना 2640 रुपये भाडे महापालिकेने एका गाळय़ाकरिता निश्चित केले होते. बोलीला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभल्याने सर्वाधिक बोली 10 हजार 200 रुपयांपर्यंत लागली होती. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या भाडे रकमेच्या तीन ते चार पटींनी जादा भाडे मिळणार आहे.
एकूण 61 गाळय़ांपैकी 11 गाळे मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. पण राखीव नागरिकांतून कोणीच प्रतिसाद दर्शविला नाही. त्यामुळे मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 11 गाळय़ांसाठी बोली लागलीच नाही. केवळ 50 गाळय़ांनाच बोली लावण्यात आली. राखीव ठेवण्यात आलेल्या 11 गाळय़ांसाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्मयता आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण खुले असल्याने कोणीच व्यवसाय करीत नव्हते. त्यामुळे भाडे वसूल करण्यास महापालिका प्रशासनाला अडचणीचे ठरले होते. परिणामी गेल्या कित्येक वर्षांपासून मनपाला महसूल मिळाला नव्हता. मात्र, भाडे वसुलीसाठी सोयीचे व्हावे तसेच गाळेधारकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने गाळय़ांना जाळी बसविण्यात आली आहे. त्यामुळे प्रारंभी विरोध दर्शविण्यात आलेल्या गाळय़ांना मागणी वाढली. या गाळय़ांच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाकाठी 25 लाखाचा महसूल मिळणार आहे.