इंग्लंडविरुद्ध मालिका गाजवणाऱया शार्दुल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्यावर संघाचा फोकस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध दोन महिने चाललेल्या मालिकेत भारतीय संघाने धावांच्या तुलनेत भले फारसे पराक्रम गाजवले असतील वा नसतीलही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन साकारले. शिवाय, अष्टपैलू शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्यासारखे खेळाडू धडाकेबाज खेळ साकारण्यात यशस्वी ठरल्याने भारतीय संघाची युवा पिढी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सुसज्ज आहे, याचाही येथे दाखला मिळाला आहे.
मुंबईच्या शार्दुल ठाकुरची धडाकेबाज एन्ट्री या मालिकेत लक्षवेधी ठरली. भविष्यात तो विशेषतः विदेशातील खेळपट्टय़ांवर आपल्या भेदक स्विंग गोलंदाजी व तंत्रशुद्ध, आक्रमक फलंदाजीच्या बळावर धवल यश खेचून आणू शकेल, याचे हे संकेत मानले जातात. इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी त्याचप्रमाणे हार्दिक पंडय़ाने ज्याप्रमाणे वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली, तीच अपेक्षा शार्दुलकडून निश्चितपणाने केली जाऊ शकते.
सूर्यकुमारकडून अपेक्षा
जर शार्दुल सर्व क्रिकेट प्रकारात सीम बॉलिंग अष्टपैलू बनत असेल तर वॉशिंग्टन सुंदर सर्व क्रिकेट प्रकारात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून अनेक पर्याय उपलब्ध करुन देईल आणि त्याने फलंदाजीत किंवा गोलंदाजीत आघाडीची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली तर ही बाब भारताच्या पथ्यावर पडू शकते. सूर्यकुमार यादवला पदार्पणासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्याचे त्याने सोने केले आणि यामुळे त्याच्याकडून आशाअपेक्षा उंचावल्या आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले, ही भारतासाठी सर्वात महत्त्वाची कामगिरी ठरली. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात फज्जा उडाल्यानंतरही संघाने जी जोरदार मुसंडी मारली, ते विशेष महत्त्वाचे होते. रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल यांचे त्यातील योगदान वाखाणण्याजोगे होते. आगामी इंग्लंड दौऱयात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसह 6 कसोटी सामने खेळताना त्यात आघाडीचे खेळाडू कोण असतील, हे देखील या मालिकेत बरेचसे सुस्पष्ट झाले.
टी-20 विश्वचषकासाठी रणनीती
ऑक्टोबरमध्ये खेळवल्या जाणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताने इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात अनेक प्रयोग आजमावून पाहिले आणि यात काही युवा खेळाडूंनी लक्षवेधी प्रदर्शन साकारल्यानंतर हा प्रयोग यशस्वी देखील झाला. इयान चॅपेल यांनी नमूद केल्याप्रमाणे सध्याचा भारतीय संघ 1970 च्या दशकातील तगडय़ा विंडीज संघाच्या किंवा 1990-2000 च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाच्या तोडीस तोड कामगिरी करण्यात सक्षम आहे.
ऑस्ट्रेलियन भूमीत भारताने राखीव खेळाडूंच्या लाईनअपची क्षमता दाखवली, तो जर ट्रेलर असेल तर इंग्लंडविरुद्ध संघाने आक्रमक खेळी साकारत सर्व क्रिकेट प्रकारात सलग 3 मालिकाविजय नोंदवले, हा खरा पिक्चर होता. अष्टपैलू रवींद्र जडेजासारखा खेळाडू येथे उपलब्ध नव्हता. पण, अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच मालिकेत एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे खेळ साकारत अश्विनच्या बरोबरीने लक्षवेधी योगदान दिले. त्याने 3 कसोटी सामन्यात 27 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. साहजिकच, 18 जूनपासून खेळवल्या जाणाऱया विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी जर रवींद्र जडेजा उपलब्ध होत नसेल तर अक्षर पटेलला संधी मिळू शकते.
मुख्य प्रशिक्षकांकडून संघाच्या कामगिरीची प्रशंसा
भारताने या हंगामात गाजवलेला पराक्रम सर्वोच्च ठरु शकेल, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघातील खेळाडूंची प्रशंसा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 व कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात विजय संपादन केला. यातील तिसऱया व शेवटच्या लढतीनंतर शास्त्री यांनी ट्वीट करत संघाचे अभिनंदन केले.
कोटस
कसोटी क्रिकेट हाच माझा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. त्यामुळे, आयपीएल स्पर्धेतील वर्कलोड मॅनेजमेंटवर माझा भर असणार आहे. आयपीएलमध्ये दमछाक होऊ नये, यासाठी मी हरसंभव प्रयत्न करेन.
-आघाडीचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार
सॅम करणची तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीतील नाबाद 95 धावांची खेळी अतिशय लक्षवेधी होती. त्याच्या या खेळीमुळे मला दिग्गज फिनिशर महेंद्रसिंग धोनीची प्रकर्षाने आठवण झाली.
-इंग्लंडचा हंगामी कर्णधार जोस बटलर