मात्र पाणी लवकर ओसरल्याने लोकांची सुटका, केपे – मडगाव मार्गावरील वाहतूकही लगेच सुरळीत
वार्ताहर / केपे
राज्यभरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पारोडा येथील पूल पाण्याखाली गेला. यंदाच्या मोसमात अनेक वेळा मुसळधार पाऊस पडला असला, तरी हा पूल पाण्याखाली गेला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून होणाऱया मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी पारोडा पुलावरून पाणी वाहत असल्याचे दिसले.
सदर पाणी नंतर वाढल्याने काही पाणी मडगाव-केपे या मुख्य रस्त्यावर येऊन येथील रस्ता जलमय झाला. मात्र पुराचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर आले नसल्याचा अंदाज घेत मडगाव-केपे मार्गावरील प्रवासी बसेस व इतर वाहने धोका पत्करून या पाण्यातून जात राहली. पण पाणी आणखी वाढल्यानंतर अवेडे-कोठंबी या भागांतील लोकांना पारोडा पुलावरून जाण्यास बंदी करण्यात आली तसेच मडगाव-केपे या मार्गावरील वाहने दुसऱया मार्गाने वळविण्यात आली. मात्र दुपार होईपर्यंत पाणी ओसरल्याने मडगाव-केपे मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली तसेच पारोडा पुलावरून वाहणारे पाणीही कमी झाल्याने पूल लोकांकरिता खुला करण्यात आला.
दरवषी पारोडा पूल पावसाळय़ात पाण्याखाली जाऊन त्याचा परिणाम मडगाव-केपे मार्गावर होत असतो. यामुळे या मार्गावरील वाहने चांदर किंवा इतर मार्गाने वळवावी लागतात. दरवषी 5-6 वेळा पारोडा पूल पाण्याखाली जात असतो. यामुळे सांगे, कुडचडे, केपे, नेत्रावळी व इतर भागांतील जे लोक मडगावला कामानिमित्त जात असतात त्यांना बरीच अडचण होत असते. मात्र यंदा पहिल्यांदाच पारोडा पूल पाण्याखाली जाण्याची घटना घडली आहे. तसेच काही वेळातच पुराचे पाणी ओसरल्याने दरवर्षीप्रमाणे लोकांना त्रास झाला नाही.
अजून उपाययोजना नाही
दरवषी कुशावती नदीला येणाऱया पुरामुळे पारोडा पूल पाण्याखाली जातो तेव्हा त्याचा त्रास फक्त मडगाव-केपे मार्गावरून ये-जा करणाऱया लोकांनाच नव्हे, तर त्याहून जास्त पारोडावासियांना होत असतो. त्यांचा संपर्क काही वेळा तुटत असतो. आजुबाजूच्या शेतात, बागायतींत पाणी घुसत असते. काही वर्षांपूर्वी स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर अनेक वर्षे गेली, तरी यासंदर्भात काहीच झालेले नाही. यामुळे पावसाळय़ात जनतेला सतावणारा हा प्रश्न तसाच कायम राहिला आहे. याकडे आताचे मुख्यमंत्री तरी लक्ष देतील का असा सवाल लोक करत आहेत.