महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
यादवांचा राजा उग्रसेन याच्या दरबारातच देवषी नारदांनी बातमी दिली की शोणीतपुरात बाणासुराने अनिरुद्धाला नागपाशात बांधून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्ण, बलरामदादा, प्रद्युम्न या सर्वांच्या समक्षच नारदमुनींनी ही बातमी दिली. ही बातमी ऐकून सारेच यादव प्रक्षुब्ध झाले. सगळे आवेशाने उठले. कृष्ण हेच त्यांचे उपास्य दैवत. कृष्णाशिवाय ते इतर कुणालाही पुजत नसत. कृष्णाने आज्ञा करताच सारी यादव सेना शोणितपूरावर आक्रमण करायला सज्ज झाली. शस्त्रास्त्र सज्ज करण्यात आली. रण वाद्ये वाजू लागली. यादवांच्या छोटय़ाशा आश्रितालाही हात लावण्याचा विचार प्रत्यक्ष यमराजही करू शकत नाही. इथे तर प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यालाच बंधनात टाकण्याचे धाडस बाणासुराने केले होते. या बाणासुराला धडा शिकवायलाच हवा. शोणितपूरावर आक्रमण करू आणि बाणासुराला पराभूत करू. प्रत्यक्ष शंकर आडवे आले तरी त्यांनाही कठोर शिक्षा करू असा निर्धार करून यादवी सेना शोणितपूराकडे निघाली.
ज्ये÷ कृष्णाचा नंदन । जो कां मकरध्वज प्रद्युम्न ।
आणि प्रतापी युयुधान । सात्यकि अभिधान जयाचें । तृतीय धाकुटा श्रीकृष्णबंधु । केवळ धनुर्विद्येचा सिंधु । जेणें भंगिला जरासंधु । रुक्मिणीहरणसमरंगीं ।
चौथा जाम्बवतीचा तनय । साम्बनामा वृष्णविर्य ।
ज्याचें अमोघ वीर्घ शौर्य । समरिं प्रळयपावक जो ।
सारणनामा पांचवा वीर । यदुयूथपांमाजी शूर ।
ज्यासीं सुभट न धरी धीर । प्रळयरुद्रसमतेचा ।
नंद उपनंद हे दोघे । सव्यदक्षिणपार्श्वभागें ।
चालती रामकृष्णांसंगें । आज्ञाप्रसंगें वर्तती।
भद्रातनय भद्रवीर । श्रीकृष्णाचा औरस कुमर ।
प्रतापतेजस्वी भास्कर । अपर भृगुवर समरंगीं ।
एवं यादवसेनाधर । वृष्णिअंधक भोज कुकुर ।
सांगतां सर्वांचा विस्तार । ग्रंथ फार वाढेल ।
एवं द्वादश अक्षौहिणी । सन्नद्ध बद्ध चतुरंगिणी ।
सवें घेऊनि रामकृष्णीं। द्वारकेहूनि निघाले ।
वाद्ये वाजती भयंकरें । म्हणती जयांतें रणतुरें ।
सिंहनादाचेनि गजरें । भरलें शारें कृतान्ता ।
ऐसे वीर प्रतापजेठी । पातले शोणितपुरानिकटीं । बाणनगरा देऊनि घरटी । बैसले हठी बळसिंधु ।
रोधूनि सर्वही दिग्विभाग । पुरग्रहणार्थ करिती लाग ।
बाहेर निघावयातें मार्ग । नागरवर्ग न लाहती ।
ऐसे प्रतापी सात्वतश्रे÷ । झाले शोणितपुरिं प्रविष्ट ।
नगरनागरां देती कष्ट । तेंही स्पष्ट अवधारा ।
म्हणाल मानुषी यादवसेना । केंवि पातली बाणभुवना । ऐसा संशय भासेल मना । यदर्थीं वचना अवधारा । द्वारका निर्मिली कवणेपरी । कैसी मथुरा नेली रात्रीं । ज्यातें सुधर्मा ओपिली अमरिं । तो काय न करीश्रीकृष्ण । वोळगे ति÷ती अमरगण । त्यातें विमानीं यादवसैन्य । वाहूनि नेतां प्रयास कोण । न कीजे प्रश्न येविषयीं ।
सपक्ष तुरंग जुंतिले रथीं । सपक्ष अश्वीं वीरपंक्ति ।
मनोवेगें गगनपथीं । जाऊनि रोधिती बाणपुरा ।
नगर रोधूनि चहूंकडे । यादव प्रतापी बैसले गाढे ।
युद्ध करिती कोण्या पाडें । तें निवाडें परिसा हो ।