कोरोनाने घडवली जन्माची अद्दल! : जालन्यातील तरुण बांद्यात अलगीकरण कक्षात : मडगावहून जालन्याला जात होते चालत : काळजीने घरचे झालेत व्याकूळ
मयुर चराटकर / बांदा:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने आम्ही आमच्या गावापासून खूप दूर अडकून पडलो आहोत. या कोरोनापासून देशाचे संरक्षण होवो. पण, या व्हायरसमुळे खूप काही शिकता आले. आम्ही आमच्या मुलांना चांगले शिक्षण देता येईल, यासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी एवढय़ा दूर आलो होतो. पण, यापुढे काही झाले तरी आम्ही गाव सोडणार नाही, आपला गाव तो आपला गाव, त्याच ठिकाणी आपण सुरक्षित असतो, कोरोनाने आम्हांला जन्माची अद्दल घडवली. गावात राहून शेती, मोलमजुरी करून पोट भरू. पण, यापुढे गाव सोडणार नाही, असे सांगताना जालन्याच्या तिघा युवकांना अश्रू अनावर झाले.
देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर मडगाव येथून आपल्या गावी आंबड, (ता. वडगुदे, जि. जालना) या ठिकाणी पायी जात असताना सावंतवाडी तहसीलदार यांनी अलगीककरण करून ठेवले. यामध्ये तानाजी कुराडे, राजू डोंगदिवे व महेंद्र सिंग या तिघां युवकांचा समावेश आहे. सदर युवक मडगाव-गोवा येथे काम करत होते. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते आपल्या गावी परतत होते. दरम्यान, त्यांना प्रथम सावंतवाडी येथे व आता बांदा तपासणी नाका येथे अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. आपल्याला कोणताच आजार नसून आम्हाला लवकरात लवकर घरी जायचे असल्याचे ते सांगत आहेत.
घरातील मंडळी भीतीच्या छायेत
सदरचे तिन्ही युवक मडगाव-गोवा येथे गेली पाच वर्षे काम करीत आहेत. यातील तानाजी कुराडे हा युवक प्लंबरला हेल्पर म्हणून काम करीत आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. घरी सुमारे साडे तीन एकर शेती असून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बाजरीचे पीक घेतो. मात्र, पैशाची कमतरता व घरची जबाबदारी असल्याने मी या ठिकाणी हेल्परचे काम करतो. मला काही करून गावी जायचे असून घरची माणसे माझ्या प्रतिक्षेत आहेत. मी इथे सुखरुप असलो तरी घरातल्यांना मी असुरक्षित असल्याचे वाटत आहे. यातील महेंद्र सिंग यांच्या घरी शेती असून गोवा येथे प्लंबरची कामे करतात. केवळ पैसे हवे, यासाठी आम्ही गाव सोडून बाहेर पडलो. सिंग यांना एक मुलगा असून घरची सगळी जबाबदारी आपल्यावर असून मी इकडे असल्याने घरातील भीतीच्या छायेखाली असल्याचे सांगतात. यातील राजू डोंगदीवे हे अवाविहित असून गोवा येथे गेली पाच वर्षे काम करतात. त्यांच्या घरी शेती असून केवळ पैसे हवे यासाठी आम्ही इकडे आलो.
शिक्षणाच्या अभावामुळे गावापासून दूर यावे लागले…..
आमच्या गावापासून जवळच एमआयडीसी असून त्या ठिकाणी नोकरी मिळते. मात्र, आमचे शिक्षण नसल्याने आम्हाला गोवा येथे यावे लागले. गावी शेती असून त्या शेतीवर आमचा फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो. मात्र, आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला दूर राहवे लागत असल्याचे ते सांगतात. आम्ही काढलेले हाल पाहता आमच्या पुढील पिढीवर असे हलाखीचे दिवस येता नये, म्हणून आम्ही या ठिकाणी राहून गावी पैसै पाठवित असतो.
यापुढे गाव सोडणार नाही..
कोरोनाची लागण होता नये, यासाठी पेंद्र सरकार व राज्य सरकारच्यावतीने संचारबंदी जाहीर केल्याने आम्ही आमच्या गावच्या दिशेने जात होतो. ज्या ठिकाणी गोव्यात राहत होतो, त्याठिकाणी बिनकामाचे राहणे आमच्यासाठी खूप कठीण होते. घरची जबाबदारी असल्याने आम्हाला घरी काय पाठविणार? आम्ही काय खाणार? असा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. अशा परिस्थितीतही पायी घरी जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. यातच यातील राजू डोंगदीवे या युवकांची वाटेत बॅग चोरीला गेली. यात पैसेही चोरीला गेले. त्यामुळे आम्हाला मोठी चिंता आहे. मात्र, आम्हाला शासनाच्यावतेने या ठिकाणी सुखरुप राहवे, यासाठी अलगीकरण करून ठेवण्यात आले. यात आमच्यासोबत आमच्या घरच्यांची फरफट होत आहे. आमच्यावर घर अवलंबुन असल्याने आमची बायको, मुले, आई, वडील आमच्या वाटेकडे नजरा लावून आहेत. बातम्या बघितल्यानंतर त्यांना वाटत असेल की आम्ही पण संकटात आहोत. पण, या कोरोनाने आम्हांला जन्माची अद्दल घडविली. एकवेळ उपाशी राहू, पण यापुढे गाव सोडून पुन्हा कधी बाहेर पडणार नाहीत, असे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.