वार्ताहर / पाचगाव
मोरेवाडी तालुका करवीर येथील ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी रविवारी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोनाच्या या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावची स्वच्छता ठेवणे, कोरोना पेशंट सापडलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करने अशी वेगवेगळी कामे केली आहेत या त्यांच्या कामाबद्दल वास्तविक त्यांना बोनस देणे अपेक्षित आहे.
मात्र मोरेवाडी ग्रामपंचायतीने 25 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम जानेवारी 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत त्यांच्या पगारा मधून कपात केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या फंडामध्ये ही रक्कम जमा केलेली नाही. यामुळे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या रकमेवरील व्याजास मुकावे लागणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिवावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो मात्र त्यांच्यावरच ग्रामपंचायतीने अन्याय केला आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे, गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे, ग्रामपंचायतीत हुकूमशाही पद्धत सुरू आहे असे आरोप आशिष पाटील यांनी केले.आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तात्काळ फंड जमा करावा, तसेच ग्रामसेवक व सरपंच यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य रियाज नदाफ ,संभाजी मोरे ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विशाल पाटील उपस्थित होते.