सांगली / प्रतिनिधी
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शासनाकडून 15 ते 18 वयोगटातील युवक, युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जिल्ह्यात अंदाजे 1 लाख 37 हजार इतक्या युवक युवतींची संख्या असून यांच्या लसीकरणाचे नियोजन करावे. प्रामुख्याने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांची निश्चिती करून या ठिकाणी लसीकरण कक्ष सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी. त्याचबरोबर जिल्ह्यात आत्तापर्यंत 65.38 टक्के लोकांचा दुसरा डोस झाला आहे. तर 79.9 टक्के लोकांचा पहिला डोस झालेला आहे. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये लसीकरणाची टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी दिसून येत आहे, अशी गावे, शहरातील भाग निश्चित करून या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचे लसीकरण कॅम्प लावून प्राधान्याने लसीकरण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. आता ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेच पर्याय आहे. जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील अंदाजित 1 लाख 37 हजार इतक्या युवक युवतींची संख्या असल्याने यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे. हे लसीकरण प्रामुख्याने ते शिक्षण घेत असलेल्या शाळा, महाविद्यालयात करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. संभाव्य तिसरी लाट आलीच तर शाळा व कॉलेज बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या लसीकरणास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी 21 लाख 80 हजार 800 पात्र नागरिकांपैकी 19 लाख 42 हजार 918 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 14 लाख 25 हजार 916 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तरी ज्यांनी अद्यापही पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, 50 टक्के पेक्षा जास्त लसीकरण कमी असलेल्या गावांवर अधिकचे लक्ष केंद्र करण्यात आले असून अशा गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. लसीकरण कमी असलेल्या गावांमध्ये जानेवारी 2022 मध्ये विशेष लसीकरण अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्य करत आहे. त्याचबरोबर हर घर दस्तक या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात जावून लसीकरण करण्यात येत आहे. तरी नागरिकांनीही लसीकरणास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.