एका गटाकडून ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल : दुसऱया गटाकडून विनयभंगचा गुन्हा दाखल : दोन्ही फिर्यादीसह सहा जणांना अटक
प्रतिनिधी / सातारा
दुकानात साहित्य आणायला गेलेल्या युवतीला आडवून तिची छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या तिच्या आई, वडील, काका यांना मारहाण केल्याची एका गटाने फिर्याद दाखल केली आहे. तर दुसऱया गटातील श्रुतिक साठे याने ऍट्रासिटी व मारहाणीचा गुन्हा दहा जणावर दाखल केला आहे. दोन्ही फिर्यादीसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 20 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून ती दि. 16 रोजी सायंकाळी 6 वाजता किराणा दुकानात साहित्य आणायला गेली होती. त्यावेळी तिच्या ओळखीचा हृतिक अनिल साठे हा आला. त्यांने तिचा हात पकडून आय लव्ह यु, मी तुला पळवून नेणार आहे असा म्हणाला. तिने हात झटकून घाबरून घरी आली. तिच्या आईला घडलेला प्रकार तिने सांगितला. रात्री 8.30 वाजता तिचे आई वडील दुचाकीवरून हृतिकच्या घरी समजावण्यास गेले. अनिल एकनाथ साठे हे बाहेर रस्त्यात भेटले. तिच्या वडिलांनी जाब विचारताच थेट अनिल साठे यांनी तिच्या वडिलांच्या कानाखाली मारली. आईलाही मारहाण केली. तेथे हृतिक आला अन् त्यानेही दोघांना मारहाण केली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात ती युवती व तिचे आई वडील गेले. तिच्या चुलत्यास वडिलांनी फोन करुन त्या तिला पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले.
त्या युवतीला चुलता, चुलती दुचाकीवरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आनंदा साठे याने गाडी आडवत चावी काढून घेतली. युवती आणि तिची चुलती गाडीवरून खाली उतरली. त्यावेळी आनंदा साठे, पिराजी साठे, प्रकाश साठे, सूरज साठे, सागर वायदंडे यांनी भांडणास सुरुवात केली. गाडी ढकलून देत तिच्या चुलतीस शोभा वायदंडे हिने मारले. बाकीच्यांनी लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली.
तर हृतिक साठे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तो व त्याच्या घरातील घरात बेडवर बोलत रात्री 8.30 वाजता बसले असताना त्याच्या ओळखीचे आठ जण हातात कोयते व लोखंडी रॉड घेऊन आले. त्यांनी घरात शिरून त्याचे वडील अनिल साठे यांना काहींनी कोयत्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या हृतिकच्या डोक्यात जखम केली. त्याची आई भांडण सोडवायला आली तिलाही त्यांनी मारहाण केली. त्याची पत्नी प्रतीक्षा, मामा सागर वायदंडे, आजोबा आनंदा साठे, भावजय नेहा साठे यांना मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ केली. घरातील साहित्य नासधूस केली. बाजूच्यानी ही भांडणे सोडवली असून यावरून आठ जणांवर मारहाण व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा वाई पोलीस तपास करत आहेत.
वाई पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर टळले असते
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवतीची छेड प्रकरणावरून दोन्ही गट एकमेकांच्या समोर भिडले. त्याच वेळी जर पोलीस घटनास्थळी पोहचले असते तर मारामारीचा प्रकार टळला असता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही असाच प्रकार वाई शहरात घडला. एका नागरिकाने वाई पोलिसांना भांडण सुरू असल्याचे फोनवरून कळवले होते. हे भांडण दोन गटात शेतात सुरू होते. तेथे पोलीस त्यावेळी पोहचलेच नाहीत. सुदैवाने ती भांडणे त्यावेळी मिटली असली तरीही पोलिसांनी दोन्ही गटास समज देणे गरजेचे होते, अशी चर्चा सुरू आहे.
ठाणे अंमलदार मॅडम यांचे धन्यवाद
एका युवतीची छेडछाड होऊन दोन गटात मारमारीची घटना घडली. दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल झाले तेव्हा पत्रकारांना माहिती देताना नेमकी काय द्यायची याची काळजी आज डय़ुटीवर असलेल्या ठाणे अंमलदार मॅडम यांनी घेतली. माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकारांना बसवून ठेवून अगोदर हाताखालील कामे पूर्ण करून पुन्हा पीआय साहेबांचे दप्तरी यांना विचारून या, असा सल्ला देत व स्वतः पीआय साहेबांना विचारून आल्यानंतरही त्यांनी पत्रकारांना बसवुन ठेवले. वास्तविक ज्या युवतीचा विनयभंग झाला तिने फिर्याद दिली अन् तिलाच अटक केली आणि तिचे नाव, पत्ता आता नियमानुसार प्रसिद्ध करता येणार नाही हे त्या ठाणे अंमलदार मॅडम यांना माहिती असावे म्हणून खरोखरच वाईतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी धन्यवाद मानले.