पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच देशभर बहुचर्चित असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्रीपदाचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. एकेकाळी समाजवादी सरकारने दिलेल्या त्रासामुळे हतबल झालेले योगी संसदेने पाहिले होते. त्यानंतर भाजपच्या उत्तर प्रदेशातील सत्तेला मोदींकडून भेट लाभलेले योगी लोकांनी पाहिले. त्यांचा कारभार लोकांनी अनुभवला. एकाचवेळी गुन्हेगारांना ठोकून काढणारे पोलीस प्रशासन आणि त्याच वेळी सार्वजनिक आरोग्य आणि इतर अनेक बाबतीत असलेला बेफिकीर कारभार या दोन्हीचे दर्शन योगींच्या कार्यकाळात दिसून आले. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रश्नी आपला बहुचर्चित निकाल दिला आणि योगींच्या कारभाराला मोठीच मदत मिळाली. पंतप्रधान ज्या राज्यातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करतात, त्या देशातील सर्वात मोठय़ा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या कारकिर्दीकडे पाहताना उत्तर प्रदेशातील जनतेला मिश्र स्वरूपाचा अनुभव येत होता. गुंडगिरीला कंटाळलेल्या लोकांना बदल हवा होता आणि योगीना काही करून दाखवायचे होते. त्यासाठी पोलिस प्रशासनातील नोकरशाहीची त्यांना साथ लाभली. पुढे त्यांनीच योगींना बदनामही केले. उत्तर प्रदेशातील राजकारण्या प्रमाणेच अधिकारी सुद्धा सुज्ञ आणि चाणाक्ष आहेत. भाजप, मायावती आणि समाजवादी या तीन पक्षांमध्ये होणारी राज्याच्या सत्तेची विभागणी आणि केंद्राच्या सत्तेत कधी डावे, कधी काँग्रेस तर कधी भाजप असा होणारा बदल लक्षात घेऊन त्यांनी स्वतःला घडवले आहे. आपली खुर्ची सांभाळत, महत्त्वाच्या पदांवर विराजमान होत राज्यकर्त्यांना काय हवे आहे ते तंतोतंत अमलात आणण्याचे कसब असणारे बेरके अधिकारी राज्यातील प्रत्येक मुख्यमंत्र्याची पहिली कारकीर्द यशस्वी करताना दिसले आहेत. मायावतींच्या काळात अधिकाऱयांच्या बदल्यांचा जो सपाटा लावण्यात आला त्यातून प्रेरणा घेऊन पुढच्या प्रत्येक राज्यकर्त्याने आपले-परके ठरवून उत्तर प्रदेशातील नोकरशाहीमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण करून ठेवली आहे. या स्पर्धेचा लाभ योगी आदित्यनाथ यांनाही झाला. जिथले प्रशासन अधिक बेफिकीर होते तिथे मात्र त्यांची पूरती बदनामीही झाली. त्याचा फटका बसून त्यांच्या विरोधात वातावरण सुद्धा तयार झाले होते. मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक नेता अशी ओळख असणाऱया आदित्यनाथ यांनी सवतासुभा मांडला तर ते पक्षाला परवडणार नाही याची पुरती जाण असलेल्या नेतृत्वाने, योगीना सहन करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला योगींचा बुलडोजर आणि दुसऱया बाजूला मोदींचे डबल इंजिन असा प्रचाराचा दुहेरी जोर लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जनमानसाचा असलेला पक्का अभ्यास आणि ऐनवेळी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करायला लावणे, छोटय़ा जाती घटकांच्या नेत्यांशी थेट संपर्क साधणे, राम मंदिर उभारणी बाबतचे वातावरण निर्माण करणे आणि 80 विरुद्ध 20 अशा टक्केवारीचे सिद्धांत मांडणे त्यांना यशाच्या वाटेने घेऊन गेले. ऐनवेळी निष्प्रभ झालेल्या मायावती, एमआयएमचा आक्रमक प्रचार या कारणांनी समाजवादी, आप, काँग्रेस पक्षाची मतविभागणी होऊन भाजपचे अनेक उमेदवार अगदी थोडय़ा मताधिक्क्याने विजयी झाले. तरीही गत वेळेपेक्षा एकूण 59 जागा भाजपच्या कमी झालेल्या आहेत. अर्थात एकदा राज्यात सरकारचा गाडा सुराला लागला की विरोधकांच्या तंबूतील अनेकजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सत्तेशी जोडले जातात आणि विरोधक कमकुवत होतात. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या अनेक आमदारांना अत्यंत थोडय़ा कालावधीत गळाला लावले, अगदी तशाच पद्धतीने योगी सुद्धा उत्तर प्रदेशात चमत्कार घडवू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये एक स्थिरस्थावर सरकार असणे ही काळाची गरज आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱया या राज्याची प्रतिमा बिमारू राज्य अशी आहे. याच राज्यातील सर्वाधिक कामगार भारतभर विखुरले होते आणि ते कोरोनात परत आल्यानंतर उत्तर प्रदेशची सत्वपरीक्षा पाहिली गेली. देशातील सर्वाधिक तरुण आणि कष्टकरी वर्ग या राज्यात असणार आहे. मात्र त्यांचे मोठय़ाप्रमाणावर परराज्यात स्थलांतर होते. त्याचा परिणाम इतर राज्यांच्या भौगोलिक आणि सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर होतो. आधीच रोजगार घटत चालले असताना भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा संघर्षही उभा राहतो. अशा स्थितीत जेथून सर्वाधिक स्थलांतर होते त्या उत्तर प्रदेशातच रोजगाराच्या संधी निर्माण होणे, उद्योग व्यवसायाची वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने योगी आदित्यनाथ यांना आपल्या राज्याचा विकास करताना केंद्राचा निधी सरसकट आणि सढळ हाताने मिळू शकेल. मात्र, हा निधी संरचनात्मक कार्यावर खर्च झाला, व्यापार, उद्योग, सेवा क्षेत्र यांची चांगल्या प्रमाणावर वाढ झाली तर देशातील हे एक प्रमुख राज्य सुधारणेच्या मार्गावर धावायला लागेल. योगी यांच्या राज्यकारभाराच्या दुसऱया पर्वात हे काम त्यांनी हाती घेणे आणि त्यांना ते करायला लावण्यासाठी केंद्राने वचक ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा उत्तर प्रदेशातील पारंपरिक अशा छोटय़ा-मोठय़ा जातीच्या आणि दबावाच्या राजकारणात जर हे दुसरे पर्व अडकून पडले तर मात्र ती उत्तर प्रदेशासाठी दुर्दैवी वेळ ठरेल. योगींनी उत्तर प्रदेशात नवे बॉलिवूड उभे करण्याचा निर्धार केला आहे. केवळ महाराष्ट्रशी इर्षा म्हणून असा कारभार करण्यापेक्षा दक्षिण भारताप्रमाणे प्रगती साधल्यास कोणाचाही अडथळा ठरणार नाही. मात्र देशातीलच एखाद्या राज्याशी इर्षा करण्याच्या प्रयत्नात मूळ उद्देश बाजूला पडण्याचा धोका अधिक आहे. उत्तर प्रदेशाचे बलस्थान हे कष्टकरी कामगारांची प्रचंड संख्या हे आहे, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यांचे हित कसे पहायचे हे योगींनी ठरवून या पाच वर्षात कारभार केला तर जनतेला त्यांना निवडून दिल्याची धन्यता वाटेल.
Previous Articleफ्रान्सकडून अणु पाणबुडय़ा सज्ज
Next Article मुंबई-काठमांडू पुन्हा 27 पासून विमान सेवा सुरु
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.