बांदा/प्रतिनिधी-
साऊथ कोकण डीस्टलरीज या फॅक्टरीतील काचेच्या बाटल्या व काचा पुरामुळे शेतात व परिसरात घुसल्याने मोठे नुकसान झालं. याबाबत आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली तर याचे रीतसर पंचनामेहि करण्याच्या सूचना दिल्या. तर शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात येईल असे सांगून संबंधित आस्थापनेला नोटिस देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या प्रश्नावरून इन्सुली ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत योग्य ती कार्यवाही प्रशासनाने न केल्यास इन्सुली गावाला या आस्थापनेविरोधात लढा उभारावा लागेल असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी दिला.
अलीकडेच झालेल्या पुरात साऊथ कोकण डिस्टीलरीज या फॅक्टरी मधील काचेच्या बाटल्या व काचा वाहून आल्याने मोठे नुकसान झाले.तसेच याबाबत विचारणा केली असता त्या आस्थापणेने स्थानिक कामगाराना नोकरी वर घेण्यास मज्जाव केला. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबतची मागणी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन केली होती. दरम्यान, आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जात वस्तुस्थितीची पहाणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा व्यथा तहसीलदारांसमोर मा़ंडल्या. शेत जमिनीत घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या बाटल्या ह्या काचेच्या असल्याने त्या शेती जमिनीतून काढणे गरजेचे आहे.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपणही शेतकरी असून शेतकऱ्यांचा भावना जाणतो, त्यामुळे वस्तुस्थिती पहाता याबाबत वरिष्ठांच लक्ष वेधत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचं स्पष्ट केलं. तर माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दारु कंपनीकडून व प्रशासनाकडून योग्य दखल घेतली न गेल्यास संपूर्ण गावाला लढा उभारावा लागेल, यात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला पुर्णपणे ही कंपनी जबाबदार राहील असा इशारा दिला.यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी प स सदस्य नारायण उर्फ बबन राणे, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, सदा राणे,माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी,नंदू पालव, सचिन पालव, फिलिप्स रॉड्रीग्स, उमेश पेडणेकर, रवी परब, अमित सावंत ,महादेव मोरजकर, नाना परब, गुरु मोरजकर, बाळा कुडव, तलाठी अनिल आयरे आदी उपस्थित होते.