जनतेने दिलेला स्वाभाविक कौल डावलून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले तेव्हाच आगामी राजकीय नाटकाची चाहूल लागलेली होती. त्याचा पहिला प्रवेश अर्थातच पहाटेच्या शपथविधीने सुरू झाला होता. शरद पवारांसारख्या धुरंधर नेत्याने त्यावर झटकन पडदा पाडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापनेची संहिता लिहिली आणि भाजपमध्ये उघड, तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये ‘दबलेली’ खळबळ होती. तीन पक्षांची महाविकास आघाडी चालवणे हे सोपे काम नाही. तब्येत साथ देत नसताना उद्धव ठाकरे हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्री. पवारच पडद्यामागचे सूत्रधार आहेत हे आता लपून राहिलेले नाही. तथापि, राज्यसभा निवडणुकीत आणि अगदी काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रत्यय देत एकप्रकारे चमत्कारच घडवून आणला. त्यासाठी अर्थातच साम, दाम, दंडाची नीती अवलंबली नसेलच असे नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना उमेदवारी देऊन आगामी राजकीय नाटय़ाची रचना केली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यामुळे काही खाती रिक्त झाली आहेत. त्यांची अतिरिक्त जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे ती काढून खडसे यांना संधी देण्याचा पवार यांचा मानस आहे. निवडून आल्यावर खडसे यांनी भाजपमधील काही सहकाऱयांनी मदत केल्यामुळे निवडणूक सोपी झाल्याचे सांगून संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या दुसऱयाच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या विधानातील हवाच काढून घेतली. विधानपरिषद निवडणुकीत पुरेशी मते नसताना भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येतो, या घटनेला महत्त्वाचा राजकीय अर्थ आहे. फडणवीस विरुद्ध खडसे असा जोरदार संघर्ष होईल, असे वाटत होते. पण फडणवीस यांनी चंद्रकांत हंडोरे हे ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडून आपला हेतू साध्य केला. तो करताना त्यांचे नागपुरातील प्रतिस्पर्धी नाना पटोले यांचाही त्यांनी धोबीपछाड केला. हंडोरे हे नानांच्या आतल्या गोटातील कार्यकर्ते. त्यांच्या पराभवाने प्रसाद लाड यांची वर्णी लागली आहे. लाड यांची धनशक्ती मोठी आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील मर्यादा आणि खदखद लक्षात आलेली आहे. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्या प्रकारची नाटय़े याआधी रंगवलेली होती, त्याच पद्धतीचे किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस नाटय़ आता रंगले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा दिल्यानंतर, शिवसेनेने साथ सोडल्याने तोंडघशी पडलेले देवेंद्र फडणवीस ठाकरे यांच्या सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अस्वस्थ होते. वेगवेगळय़ा पातळय़ांवरून त्यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. जगभरात कोरोनाचा उदेक झाला. त्यामुळे काही काळ ‘फोकस’ बदलला होता. पण राज्यसभा आणि आताच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर राजकारण एका निर्णायक टप्प्यावर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ‘नाराजवंतां’ना हेरून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना बळ दिले आहे. पुन्हा येण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे, हे त्यांनी चाणाक्षपणे ओळखले. एरवी, नुसत्या निवडणुका जिंकण्याचा उपयोग काय? सत्ताग्रहणाचे अंतिम ध्येय गाठता येत नसेल तर या विजयाला काय अर्थ? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही अनैतिहासिक, अनैसर्गिक तिघाडी सत्तेवर राहते, याचे शल्य फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला होतेच. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेची आगामी वाटचाल आणि स्थिती दर्शवणारे आहे. ठाण्यातील एकेकाळचे मातब्बर नेते आनंद दिघे यांचे विश्वासू साथीदार असलेल्या शिंदे यांनी शिवसेनेचे राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा डंका वाजत होता तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू झाला होता. शरद पवार यांच्या धोरणीपणामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. शिवसेनाप्रमुखांना सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा होता, एकनाथ शिंदे त्यादृष्टीने योग्य उमेदवार होते. पण सत्ताधीशाच्याच घरी सत्ता पाणी भरू लागली आणि शिवसेनेत अंतस्थ खदखद वाढू लागली. ‘वाचाळ’ प्रवक्त्यांनी आपल्या पायाखाली काय जळतेय ते न पाहता आडवीतिडवी शाब्दीक तलवारबाजी सुरू ठेवली, त्याचा सत्ताधारी घटकांमध्ये सुप्त विपरित परिणाम होत होता. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कौशल्याने सगळी राजकीय परिस्थिती पाहिली आणि आक्रमकता न दाखवता व्यूहरचना केली. राज्यसभा आणि विधानपरिषदेतील त्यांच्या उमेदवारांचे विजय ही त्याची चुणूक होती. महाविकास आघाडीची सत्ताच उलथवून टाकली तर खडसे यांच्यासारख्या मोहऱयाचा पवार यांना काहीच उपयोग होणार नाही. उलट खडसे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढत जाणार, हेही उघडच आहे. राजकारणात प्रत्येक गोष्ट धीराने आणि संयमाने घ्यायची असते. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळायला हवे म्हणून उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला आततायीपणा आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला भोवणार असल्याची चर्चा आहे. कारण फडणवीस यांनीही निवडून येण्याची क्षमता असणारेच नेते जवळ करण्याचे पवार यांचे धोरण अप्रत्यक्षपणे अवलंबले आहे. राजकीय नाटय़ाच्या या प्रवेशात देवेंद्र यांच्या रुपाने शरद पवारांचेच दर्शन घडते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सगळय़ा नाटकात, जनता कुठे आहे? महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत, त्यांची उत्तरे कशी मिळणार?
Previous Articleशिवस्तवन
Next Article ‘इपीएफओ’सोबत जोडले 17 लाख सदस्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.