अध्याय एकोणीसावा
माणसाला दोन प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असते. पहिले लौकिक म्हणजे शाळा कॉलेजातून मिळते ते. त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो. आणि दुसरे पारमार्थिक म्हणजे वेद शास्त्र इत्यादी पण हे शिक्षण घेण्याची आवश्यकता वाटणे आणि तशी संधी मिळणे हे फारच थोडय़ा लोकांच्या बाबतीत शक्मय होते. वेद शास्त्र शिकून भगवंताचं स्वरूप जाणून घेता येतं त्यायोगे आपलं ध्येय काय असावं याची जाणीव होते एवढंच. ज्ञानाने देव कळतो पण मिळत नाही. त्यासाठी भक्तीच करावी लागते. सर्वसामान्य लोकांना संतांची शिकवण लगेच पटते आणि ते भक्तिमार्गाची कास धरतात. अध्यायाला सुरुवात करताना नाथमहाराज श्रीमहादेवांची प्रार्थना करताना म्हणतात,
हे ओंकाररूप सद्गुरो ! हे त्र्यंबका ! हे ब्रह्मगिरिपर्वतावर वास करणाऱया ! हे त्रिगुणरूप त्रिपुराचा भेद करणाऱया ! हे कामांतका गिरिजेशा ! तुला नमस्कार असो. तुझा अनुहतशब्दरूप डमरु आहे तो सर्वत्र गजर करून सोडतो आणि निरंतर वेदानुवादाने कर्म, ज्ञान व भक्ति ह्या तीन कांडांच्या रूपाने गर्जत असतो.
तुझ्या हातांतील खटांग आयुध जीवपणाचाच नाश करून सोडते आणि अनंगासहित अंग जाळून टाकलेस म्हणजे मगच स्वस्वरूपप्राप्ती करून देतोस. हे त्रिनयना त्र्यंबकलिंगा ! (हें त्रिंबकेश्वराचे रूपक आहे) चित्प्रकाशगर्भा शंकरा ! तुझ्यापासूनच ‘गोदावरीरूप’ चिदगंगेचा प्रवाह वाहात असतो आणि तो पवित्रपणाने साऱया जगाला पावन करून सोडतो. दोन डोळे तर प्रत्यक्षच दिसतात आणि तिसरा ज्ञाननेत्र गुप्त आहे. म्हणून नेत्राशिवायच दिसणारा तू त्रिलोचन आहेस. तू आपल्या अंगावर बोधरुपी चंद्र धारण करतोस, म्हणून तू ‘चंद्रशेखर’ आहेस आणि खरोखर चंद्रसूर्यादि सर्व चराचरही तुझ्यामुळेच प्रकाशते. ‘भव’ या नावाची ख्याती आहे परंतु तुझी चिच्छक्ति भवानी हीच त्या भवाला प्रकाशित करते. विष्णु तूच, ब्रह्मदेव तूच व शेवटी संहार करणारा रुद्रही तूच. हे प्रलयरुद्रा! हे चित्समुद्रा शिवरूपा सद्गुरो! तू सर्व जीवांना एकरूप करून सोडतोस. हे गुरुराया! शिव शिव म्हणून निजभावाने तुझ्या पायी लागताच तू निजरूप दाखविल्याने गुरुशिष्यपण लयास जाते. ते निजस्वरूप एकदा दृष्टीस पडले की मग जीव कशाचा ? आणि सृष्टि तरी कशाची? तीन गुणांसह त्रिपुटीच नाहीशी होऊन स्वानंदाशी मिठी पडते.
त्या स्वानंदाचे उद्गार आवरता आवरत नाहीत. त्या स्वानंदाचे सार म्हणजेच खरोखर अकरावा स्कंध. त्यामध्येही अत्यंत गहन असें जें स्वानंदसुखाचे निरूपण तो हा एकोणिसावा अध्याय होय. तो शास्त्रप्रमाणांनीही सिद्ध आहे. ते निरूपण ऐकताच परमानंद केवळ उचंबळून राहतो. ह्याकरिता एकाजनार्दन विनंति करतो की, श्रोत्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्यावे. सतराव्या आणि अठराव्या अध्यायात स्वधर्मकर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते, म्हणून वर्णाश्रमाचे सर्व प्रकार उद्धवाला भगवंतांनी सांगितले.
आता एकोणिसाव्या अध्यायात ज्या ज्ञानाने आत्मज्ञान साध्य केले असेल, त्या ज्ञानाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत. जीवन्मुक्ताला कर्मकर्तव्यतेचे कारण नाही, म्हणून उद्धवाच्या ‘यम, नियम’ इत्यादि प्रश्नाचे उत्तरही श्रीकृष्ण ह्यातच सांगतील. शास्त्रयुक्त पांडित्याचे ज्ञान, किंवा त्याने केलेले प्रपंचाचे मिथ्यात्वनिरूपण हे सर्व आनुमानिक व पुस्तकी ज्ञान होय. त्यात मुळीच तथ्य नाही. आपल्यास पूर्वेकडे जावयाचे आहे
याचे निश्चित स्मरण आहे पण दिशाभूल झाली म्हणजे पश्चिमेलाच मनुष्य पूर्व मानू लागतो त्याप्रमाणे शाब्दीक शास्त्रज्ञान आहे. पण बोलतात एक व करतात एक असं असल्याने साधकाचे कधीच समाधान होत नाही. तीच दिशाभूल नाहीशी झाली म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वेचा पूर्वेकडेच जाऊ लागतो, त्याप्रमाणे अनुभवज्ञान प्राप्त झाले म्हणजे साधकाला परमानंदाचा लाभ होतो. तो जे जे वेदान्तश्रवण करितो, ते ते तो स्वतःच होत जातो. असे होणे हेच आनुभविक ज्ञानाचे खरे व शुद्ध लक्षण होय हे ध्यानात ठेव. भगवंत या अध्यायात हे सर्व सविस्तर सांगणार आहेत.
क्रमशःः