सिंधुदुर्गातून जाणाऱया खासगी प्रवासी गाडय़ा राजापूरला अडविल्या : एसटी गाडय़ा सध्या बंदच : सिंधुदुर्गच्या सीमेवरही आता ‘ऑन दी स्पॉट टेस्ट’
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्गमधून रत्नागिरीमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱया गाडय़ा राजापूरहून परत पाठविल्या जात असल्याचे शनिवारी ट्रव्हल्स व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. परिणामी, सिंधुदुर्गकडून मुंबईकडे जाणाऱया प्रवाशांसाठी कोल्हापूर पुणेमार्गे मुंबईकडे जाण्याच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. तर, सिंधुदुर्गमध्ये येणाऱयांसाठी रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करूनच प्रवेश दिला जात असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्हय़ाच्या सीमेवर अथवा रेल्वे स्टेशनवर ‘ऑन द स्पॉट’ रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आली नव्हती. सदरची टेस्ट रविवारपासून सुरू होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
सिंधुदुर्गमधून प्रवासी वाहतूक करणाऱया एसटी गाडय़ा सध्या बंदच आहेत. मात्र, खासगी बसेस व इतर वाहने सुरू आहेत. नियमानुसार चालक, वाहकांची टेस्ट केलेली असणे वा लस घेतल्याचे सर्टिफिकेट असणे, बसमध्ये कोविड नियमांचे पालन, मास्कचा वापर, स्टँडिंग प्रवासी न घेणे अशा अटींवर जरी मुभा असली, तरीही गेल्या दोन दिवसांपासून राजापूर सीमेवरून खासगी बसेस माघारी पाठविल्या जात असल्याचे ट्रव्हल्स व्यावसायिकांचे म्हणणे आहे. येथील लक्झरी बूकिंग सेंटरशी संपर्क साधला असता ‘याबाबतचे कारण सांगण्यात येत नाही. मात्र, बसेसना प्रवेश नाकारला जातो’, असे सांगण्यात आले.
कोल्हापूरमार्गेA पर्याय
रत्नागिरीमार्गे प्रवेश नाकारण्याच्या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गमधून मुंबईकडे जाणारे प्रवासी कोल्हापूर-पुणेमार्गे जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. राजापूर सीमेवर अडविण्यात आल्याने लोकांना पर्यायी मार्ग काढत कोल्हापूरमार्गे पुढील प्रवासासाठी जावे लागत आहे.
सिंधुदुर्गमध्ये थर्मल स्कॅनिंगच
सिंधुदुर्गमधून येणाऱया गाडय़ा जरी रत्नागिरीत अडविल्या जात असल्या, तरी रत्नागिरी वा अन्य कोणत्याही मार्गाने सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करणाऱया वाहनांना सिंधुदुर्गच्या सीमेवर अडविले जात नाही. या ठिकाणी शनिवारी सायंकाळपर्यंत थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटर लावून तपासणी केली जात होती. तेथे कुणी संशयित आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांची रॅपिड ऍन्टिजेन करण्यात येत होती. तर, रेल्वे स्थानकांवरही शनिवारी सायंकाळपर्यंत थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरने तपासणी केली जात होती. तेथे कुणी संशयित लक्षणे असलेला आढल्यास त्यांनाही शहरातील रॅपिड ऍन्टिजेन टेस्टच्या ठिकाणी नेऊन तपासणी केली जात होती.
उद्यापासून ‘ऑन द स्पॉट टेस्ट’
दरम्यान, पालकमंत्री सामंत यांनी शनिवारपासून जिल्हय़ाच्या सीमेवर ‘ऑन द स्पॉट’ रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू करण्यात आली असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्हय़ाच्या सीमेवर अथवा रेल्वे स्टेशनवरही अशी सुरू करण्यात आली नव्हती. संबंधित पथकांना आज किट उपलब्ध करून देण्यात आले असून रविवारपासून प्रत्यक्ष जागेवरच रॅपिड टेस्ट सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागकडून सांगण्यात आले.
दोन वाहनांवर कारवाई
आमच्या रत्नागिरी प्रतिनिधीकडून प्राप्त माहितीनुसार, राजापूर येथे प्रवासी वाहतूक करणाऱया दोन गाडय़ांवर कारवाई झाली होती. या गाडय़ा अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी काही गाडय़ा माघारी फिरल्या होत्या. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱया गाडय़ा या अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने ते आता पर्यायी मार्गाचा अवलंब करीत असल्याचे सांगण्यात आलेaaa