वाढत्या उष्म्याने टंचाईग्रस्त वाडय़ांमध्ये वाढ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्य़ात वाढत्या उन्हाच्या कडाक्याने पाणीटंचाईग्रस्त गावांत भर पडू लागली आहे. गेल्या आठवडय़ात 7 गावांमधील 33 वाडय़ांना टँकरने पाणी सुरू होते. आठवडाभरात त्यात वाढ होऊन ही संख्या 33 गावातील 51 वाडय़ांमध्ये 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
गेल्या आठवडाभरात प्रशासनाकडे जिल्ह्य़ातील 24 वाडय़ांमधून टँकरने पाणीपुरवठयाची मागणी वाढली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पहिला टँकर जिह्यात सुरू झाला होता. या टंचाईला गुहागर व दापोली हे दोन तालुके अजूनही अपवाद ठरले आहेत. येथे एकही टँकर सुरू झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्य़ात पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून 15 कोटींच्या आराखडय़ांतील पाणी योजनांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्य़ात राबवण्यात आलेल्या ‘पाऊस पाणी संकलन’ टाक्यांमुळे नऊ वाडय़ा पाणी टंचाईमुक्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.