मौजेदापोली / वार्ताहर
दापोलीत गेले दोन दिवस बीएसएनएल कंपनीची सेवा ठप्प झाली असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये फक्त बीएसएनएलचीच सेवा उपलब्ध असल्यामुळे अनेक गावांचा जगाशी संर्पक तुटला आहे.
फोन सेवा ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. मात्र दापोलीत बीएसएनएलकडून योग्यरित्या सेवा प्राप्त होत नाही. वारंवार नेटवर्क जाणे, इंटरनेट न चालणे अशा अनेक समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावोगाव रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. अचानक एखाद्या रूग्णाला काही त्रास होवू लागल्यास तर रूग्णवाहीका कशी बोलवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्याबरोबर अजूनही काही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा घेतल्या जात आहेत. त्या परिक्षा कशा पार पडणार. त्यामुळे प्रत्येक गावात दोन तरी कंपन्यांचे टॉवर असणे गरजेचे बनले आहे. तातडीने बीएसएनएलची सेवा सुरळीत करा अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरत आहे.