प्रतिनिधी / रत्नागिरी
माझी बांधिलकी माझ्या जनतेशी आहे, जनतेचे प्रश्न तात्काळ सुटलेच पाहिजेत, अधिकाऱ्यांना असा सज्जड दम देत ना. उदय सामंत यांनी मंगळवारी रत्नागिरीत जनता दरबार घेतला. यावेळी आलेल्या तक्रारीवरून ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
जिल्हावासियांचे प्रश्न सुटावेत यासाठी ना. सामंत यांनी यापूर्वीच जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांचा जनता दरबार अल्पबचत सभागृहात पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी भडकवार, जि.प. अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, आरोग्य सभापती बाबू म्हाप आदींसह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या जनता दरबारात अनेकांनी आपले प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले. तर काहींनी आपली अनेक दिवसांची कैफियत ना. सामंत यांना ऐकवून दाखवली. वर्षानुवर्षे एकाच विषयासाठी खेटा मारायच्या तरी किती? असा सवालदेखील काहींनी उपस्थित केला. यावर ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. माझी बांधिलकी माझ्या जनतेशी आहे. त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागलेच पाहिजेत, असे ठणकावून सांगत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
या जनता दरबारात आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणी, महावितरण, रस्ते आदी विषयांवर तक्रारी घेऊन ग्रामस्थ जनता दरबारात सहभागी झाले होते. यावेळी काही प्रश्नांची उकल तात्काळ करण्यात आली. आलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देत काहींचे प्रश्न जागच्या जागी मार्गी लावल्याने अनेकांनी ना. सामंत यांचे आभार व्यक्त केले.
पहिल्याच जनता दरबाराला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. दूरवरून तक्रारदार आपले प्रश्न घेऊन आले होते. आपल्या समस्या मार्गी लागाव्यात, प्रशासन दरबारी किती उदासिनता असते याबाबतची जाणीव काहींनी करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्याच जनता दरबारात अनेकांचे प्रश्न मार्गी लागल्याने यापुढील होणाऱ्या जनता दरबारात मोठी गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.