अतिवृष्टीने काजळी नदीच्या पुरात मंदिर पाण्यात
प्रतिनिधी/रत्नागिरी
मनात अपार श्रध्दा, भक्तीभाव असेल तर कोणतेही अरिष्ट असले तरीही भक्तगण परमात्म्याच्या चिंतनातून मागे हटत नाहीत. सद्या रत्नागिरीत श्रावणाचा नामसप्ताह मंदिरा-मंदिरातून चालू आहे, त्यात अतिवृष्टीचे संकट ओढवलेले असताना गावातील नदीकाठची काही मंदिर पाण्यात गेली आहेत. रत्नागिरी तोणदे गावातही सांब मंदिर पाण्यात गेलेले असताना त्या मंदिरात भाविक ग्रामस्थ कंबरभर पाण्यात राहूनही नामसप्ताहात दंग झाल्याचा व्हिडीओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने कोकणातील मंदिरातून नाम सप्ताह पार पडतो. परमेश्वराच्या नामस्मरणात, भजनात, अभंगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तल्लीन होतात. अत्यंत पावित्र्य जपत कोकणातील गावागावातून हा सप्ताह पाळला जातो. कुठे एक दिवस तर कुठे सात दिवस खंड न पडता टाळ मृदुंगाच्या गजरात परमेश्वराचे नामस्मरण केले जाते. रत्नागिरी जवळील तोणदे येथील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सांब मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घालूनही नाम साप्ताह चालू ठेवणारे काही भाविक दिसत आहेत. मादिरापार्यंत पोहोचण्यासाठी होडीचा देखील वापर केलेला दिसत आहे. भजनी मंडळींच्या छातीपर्यंत पुराचे पाणी येऊनही या सप्ताहात त्यांनी खंड न पाडल्याचे दिसत आहे. जिह्यात सोमवारपासून मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मात्र, या पाण्यातही भक्तांनी नाम सप्ताहात खंड पडू दिलेला नाही. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे – भंडारवाडीतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, छातीपर्यंत आलेल्या पाण्यात उभे राहून भाविकांनी आपला नाम गजर सुरू ठेवला होता.