प्रतिनिधी / रत्नागिरी
किनारपट्टीवर पहाटेच्या सुमारास वाहणाऱ्या मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारांनी किनाऱ्यावर राहणे पसंत केले आहे. वेगवान वाऱ्यासह पाण्याला करंटही असल्याने अनेक नौका बंदरातच उभ्या करण्यात आल्या आहेत तसेच डॉल्फिन, जेलिफीश या माशांच्या उपद्रवाला मच्छीमारांना समोर जावे लागत आहे. परिणामी मासळीचे दर वधारले आहेत.
गेले काही दिवस मच्छीमारांना समाधानकारकरित्या मासळी मिळत होती. या हंगामामध्ये तवर, पॉपलेट, सरंगा यांसारखी किंमती मासळी मिळत होती. मात्र, अखेरच्या टप्प्यामध्ये मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी करण्यास अडथळा ठरत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून मतलई वारे सुरू झाले आहेत. पहाटेच्या सुमारास वारे वाहत असल्यामुळे दुपारपर्यंत पाणी अस्थिर राहते. त्यामुळे खोल समुद्रात जाऊनही मच्छीमारांच्या हाती मासळी मिळत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे काही मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. मच्छीमारांना मांदेली, छोटी बांगडी सापडत असून त्याचे दर वधारले आहेत. बांगड्याचा दर 120 रूपये किलोवरून 150 ते 200 पर्यंत वधारला आहे.
गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना पतिकुल हवामानाचा फटका बसला आहे. मतलई वारे व पाण्याला आलेल्या करंटमुळे जेलिफीश, डॉल्फीन किनाऱ्याकडे वळतात. या दोन्ही माशांमुळे जाळी फाटतात व नुकसान होते. जाळ्यांमध्ये सापडलेली मासळी हे मासे खातात सध्या किनारपट्टीवर डॉल्फिन झुंडीच्या झुंडीने फिरत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही माशांच्या उपद्रवामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे.