गोडोली / प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्यावर कोसळलेल्या संकटातून सावरण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २ कोटी ७६ लाखांचा निधी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.सामाजिक संकट समयी मदत करण्याचा कर्मवीर अण्णांप्रमाणे त्यांच्या पश्चात ही रयत परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला असून त्यातून पुन्हा सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून ‘रयत’ अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेतील सर्व सेवकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर संस्थेच्या १२ हजार ९६५ सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन दिल्याने रू.२ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ इतकी रक्कम जमा झाली.ती रक्कम ‘रयत’ चेअरमन डॉ.अनिल पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी या रक्कमेचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दि.९ नोव्हेंबर रोजी ही रक्कम मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली.
जेव्हा जेव्हा समाजावर नैसर्गिक आपत्ती कोसळली तेव्हा तेव्हा शरदर पवार आणि रयत शिक्षण संस्थेच्या सर्व सेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सर्व प्रकारची मदत केली आहे.
संस्थेच्या वतीने रयत सेवक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संस्थेने ३८ ठिकाणी ‘ ‘कोरोना मार्गदर्शन व मदत केंद्राची’ उभारणी केली आहे . या माध्यमातून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या गरूजूंना योग्य मार्गदर्शन आणि तातडीची मदत पुरविण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रयतने केलेल्या मदतीबद्दल संस्थेच्या सर्व सेवकांचे या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुकही केले.